Film Manache Shlok : ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव पालटणार !

  • हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित शक्तीपुढे निर्माते आणि दिग्दर्शक झुकले !

  • चित्रपटाचे खेळ बंद पाडल्यावर निर्माता आणि दिग्दर्शक यांना जाग !

  • चित्रपट आता नवीन नावाने प्रदर्शित करणार !

पुणे – ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ‘विवाहबाह्य संबंध कसे ठेवायचे ?’, याविषयीचे चित्रण आहे; मात्र त्याला समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाचे नाव देण्यात आले. यामुळे श्री समर्थ रामदासस्वामी यांचा अवमान होत असल्याने या चित्रपटाला हिंदूंनी प्रदर्शनापूर्वीच विरोध केला. हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदु आघाडी अशा संघटनांनी ‘हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी चेतावणीही दिली. तरीही हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखवण्यात आला. १० ऑक्टोबरला पुण्यात २ ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे खेळ बंद पाडले. त्यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी चित्रपटाचे शीर्षक पालटणार असल्याचे एक निवेदन प्रसारित केले आहे.

मृण्मयी देशपांडे यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट प्रसारित करत लिहिले आहे की, ‘मनाचे श्लोक’ या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर अन् पश्चिम महाराष्ट्र येथे घडलेल्या घटना अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पहाता आम्ही या चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या १६ ऑक्टोबरला पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत’, असे या निवेदनात म्हटले आहे.

‘समर्थ सेवा मंडळाच्या’ वतीने प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी !

चित्रपटाच्या शीर्षकामुळे हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच चित्रपटाच्या शीर्षकासाठी मनाचे श्लोक या शब्दांचा वापर करणे समर्थ रामदासस्वामी यांच्या अनेक अनुयायांचा अनादर करण्यासारखे आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमाणपत्र आणि प्रदर्शन यांना स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती; मात्र उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्याला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

‘हिंदूंनी संघटित होऊन धर्माविरुद्ध होणारा कुठलाही अवमान कसा रोखता येतो ?’, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हिंदू जर अशाच प्रकारे संघटित आणि जागरूक राहिले, तर हिंदु धर्मावर कुणीही आघात करण्यास धजावणार नाही !