वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी सेवा करतांना कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘१०.७.२०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांनी गुरुपौर्णिमेच्या आधी प्रसाराची सेवा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्य सेवा केल्या. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

१. गुरुपौर्णिमेच्या आधी प्रसाराची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. श्री. चंद्रकांत चव्हाण, आजरा

१ अ १. गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची सेवा करून घरी आल्यानंतर ‘मन प्रसन्न आणि शांत झाले आहे’, असे लक्षात येणे : ‘मी प्रथमच श्री. आनंदराव साठेकाका यांच्या समवेत गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला गेलो होतो. आरंभी माझ्या मनात ‘प्रसारात कसे बोलायचे ? माझे मित्र माझ्याकडे पहात आहेत’, इत्यादी प्रतिमा जपण्याचे विचार आले; मात्र साठेकाकांचे बोलणे ऐकल्यानंतर मी तसे बोलण्याचा प्रयत्न केला. प्रसार करून घरी आल्यावर ‘माझे मन प्रसन्न आणि शांत झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. घरी आल्यावर ‘जेवणाला विलंब झाला’, तरी माझी चिडचिड झाली नाही.’

१ आ. सौ. सुनीता चव्हाण, आजरा

१ आ १. कंबरेचा त्रास असतांना दूरच्या भागांमध्ये प्रसाराला जाऊनही कसलाही त्रास न होणे : ‘गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला जाण्याआधी मी ‘मला कंबरेचा त्रास असल्याने दूरच्या भागात प्रसाराला येणार नाही. जवळच्या भागात येईन’, असे सहसाधकांना सांगितले होते. नंतर मी सहसाधकांच्या समवेत दूरच्या भागांमध्येही प्रसाराला गेले; पण मला कसलाही त्रास झाला नाही. संध्याकाळी घरी जाण्यास विलंब होऊनही मी घरातील कामे आनंदाने करत होते. मी आनंदी आणि उत्साही होते.

१ आ २. सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळणे आणि शारीरिक त्रास उणावून आनंद जाणवणे : आम्ही ज्या परिसरामध्ये प्रसाराला जात होतो, त्या परिसरात मला चैतन्य जाणवत होते. सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. आमच्याकडून परात्पर गुरुदेवांनी अल्प वेळेत अतिशय चांगला प्रसार करून घेतला. ‘सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आता हीच वेळ आहे. सगळे हिंदू एकत्र यायला पाहिजेत’, असे अनेक जण आम्हाला सांगत होते. त्यामुळे माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. प्रसाराची सेवा मनापासून आणि झोकून देऊन केल्यामुळे मला आनंद जाणवला अन् माझे शारीरिक त्रासही उणावले. मी गुरुपौर्णिमेपर्यंत उत्साही होते. मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. स्नेहल नवरे, राजारामपुरी

२ अ १. सनातन संस्थेची ग्रंथनिर्मितीची ध्वनी-चित्रफीत पाहिल्यावर ‘ग्रंथलेखनाचे कार्य पुष्कळ मोलाचे आहे’, याची जाणीव होणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर आम्हाला सनातन संस्थेच्या ग्रंथनिर्मितीची ध्वनी-चित्रफीत पहायला मिळाली. सनातन संस्थेची एवढी मोठी ग्रंथसंपदा सिद्ध करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी घेतलेले कष्ट पाहून मी थक्क झाले. ‘त्यांचे कार्य किती मोलाचे आहे !’, याची मला जाणीव झाली.

२ अ २. गुरुपौर्णिमेला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून ‘प्रत्यक्ष सरस्वतीदेवी बोलत आहे’, असे जाणवणे : मार्गदर्शनापूर्वी सर्व साधकांना ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला होता. तेव्हा व्यासपिठावर एक आसंदी ठेवली होती. नंतर तिच्यावर प्रत्यक्ष श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसलेल्या पाहून मला आश्चर्य वाटले आणि माझ्या डोळ्यांत आपोआप पाणी आले. सर्व जण श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे बोलणे ऐकण्यात तल्लीन झाले. त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. मला त्यांच्याभोवती सकारात्मक शक्तीचे वलय जाणवले. मला वाटले, ‘प्रत्यक्ष सरस्वतीदेवी आपल्याशी बोलत आहे.’ कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. ही खूप सुंदर अनुभूती होती.

२ अ ३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना गुलाबाचे फूल दिल्यावर त्यांनी साधिकेचा हात हातात घेणे, त्या वेळी त्यांचा हात कापसासारखा मऊ लागणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना मी गुलाबाचे फूल दिले. त्यांनी ते फूल स्वीकारून माझा हात हातात घेतला. त्यांचा हात मला कापसासारखा मऊ लागला. तेव्हा ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांचा आशीर्वाद मला मिळाला आणि गुरुपौर्णिमेचे सार्थक झाले’, असे मला वाटले. मी दिवसभर आनंदावस्थेत होते. ‘आपल्या ध्यानीमनी नसतांना गुरु आपल्याला पुष्कळ देतात’, याची मला जाणीव झाली आणि माझी परात्पर गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’ (१०.७.२०२५)                                           (क्रमश:)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965240.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक