थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (६.१०.२०२५)

अमित शहा यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन !

गृहमंत्री श्री. अमित शहा

अहिल्यानगर – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा अन् राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गुरुस्थानाचे दर्शन घेतले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शहा यांचा सत्कार करण्यात आला.  या दौर्‍यात हानीचा अहवाल दिल्यास पुरग्रस्तांना लागेल ते सर्व साहाय्य करण्याचे आश्वासन शहा यांनी दिले.


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्री येथे चर्चा !

उद्धव ठाकरे (डावीकडे) आणि राज ठाकरे

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ५ ऑक्टोबर या दिवशी चर्चा झाली. संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशानंतर कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी गेले. मातोश्री येथे राज ठाकरे साधारण ४० मिनिटे थांबले होते. या भेटीत ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी दोघांची चर्चा झाली असावी’, असे अनुमान काढले जात आहे.


दिवाळीनिमित्त अतिरिक्त रेल्वेगाड्या

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून ३० अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. यांपैकी पनवेल ते चिपळूण २४ रेल्वेगाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव ६ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.


स्थलांतरित पक्ष्यांसाठी पाणथळ क्षेत्रांच्या संरक्षणाची मागणी !

मुंबई – झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेली पाणथळ क्षेत्रे धोक्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑक्टोबर रोजी साजर्‍या होणार्‍या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनपूर्वी पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पर्या रणप्रेमींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


लातूर येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

अनेक गावांचा संपर्क तुटला !

लातूर येथे झालेला मुसळधार पाऊस

लातूर – लातूर जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांपासून थांबलेला पाऊस ४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून पुन्हा चालू झाला आहे. रात्रभर मेघगर्जनांसाह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागांतील अनेक रस्ते, पूल आणि शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांशी संपर्क तुटला आहे. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून वाहतुकीची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर, लातूर ग्रामीण भागांत पावसाने थैमान घातले आहे.