Sana Mir : पाकिस्तानची माजी महिला क्रिकेटपटू सना मीर हिने पाकव्याप्त काश्मीरला म्हटले ‘आझाद (स्वतंत्र) काश्मीर’ !

सामाजिक माध्यमांतून टीका

सना मीर

कोलंबो (श्रीलंका) – येथे महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर समालोचन करत होती. तेव्हा तिने पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हटल्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर’ भारताचाच भाग असतांना अशा प्रकारचे विधान केल्याने त्याला विरोध होत आहे.

समालोचन करतांना सना मीर हिने पाकिस्तानी खेळाडू नतालिया परवेझ हिचा उल्लेख करून म्हटले, ‘नतालिया काश्मीरची, आझाद काश्मीरची खेळाडू आहे; पण तिला  क्रिकेट खेळण्यासाठी लाहोरला यावे लागते.’ आधी ‘काश्मीर’ असे म्हटल्यावर लगेचच सनाने ‘आझाद काश्मीर’ असा शब्दप्रयोग केल्याने विवाद निर्माण झाला.

(म्हणे) ‘कुणालाही दुखावण्याचा किंवा राजकीय भूमिका मांडण्याचा हेतू नव्हता !’ – सना मीर हिचे स्पष्टीकरण

टीका होऊ लागल्यानंतर सना मीर हिने सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. तिने म्हटले, ‘माझा उद्देश केवळ नतालियाच्या संघर्षाची कहाणी सांगण्याचा होता. त्यामागे कुणालाही दुखावण्याचा किंवा राजकीय भूमिका मांडण्याचा हेतू नव्हता. खेळाडूंची पार्श्वभूमी आणि प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हे समालोचकाचे दायित्व असते. इतर २ खेळाडूंच्या संदर्भातही मी तसेच केले, त्यांच्या प्रदेशाचा उल्लेख करून मी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. याला कृपया राजकारणाशी जोडू नका.’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची अद्याप प्रतिक्रिया नाही !

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने कोणतेही विधान केलेले नाही. ‘विश्वचषकासारख्या स्पर्धेत राजकीय टिपणीला स्थान नसावे. पुरुष आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यांच्या एका उल्लेखावर त्यांना दंड ठोठावला गेला; पण पाकिस्तानकडून भारताच्या अविभाज्य भूभागाविषयी वारंवार वादग्रस्त शब्दप्रयोग होत असतांनाही ठोस कारवाई होत नाही’, अशी नाराजी तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • महिला असो कि पुरुष पाकिस्तानी खेळाडूंमध्ये भारतद्वेष नसानसांत ठासून भरलेला असल्याने ते अशा प्रकारचेच कृत्य करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी क्रिकेट खेळण्यावर संपूर्ण बहिष्कार घालणेच योग्य आहे. यासाठी आता भारतियांनी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अशा घटनांच्या संदर्भात नेहमीच निष्क्रीय असतो, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे !