आम्ही हमास, हिजबुल्ला आदी सर्व शत्रूंना नष्ट केले ! – Netanyahu In UN

  • संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची माहिती

  • अनेक देशांच्या राजदूतांनी भाषणावर टाकला बहिष्कार !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या वर्षभरात परिस्थिती पालटली आहे. इस्रायलने त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला आहे. आम्ही येमेनमधील हुती, गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्ला, तर सीरियातील असद आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इराणचा अणूप्रकल्प नष्ट केला आहे, अशी माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दिली.

अनेक देशांच्या राजदूतांचा भाषणावर बहिष्कार

नेतान्याहू यांचे भाषण चालू होताच अनेक देशांच्या राजदूतांनी त्यावर बहिष्कार टाकत ते सभागृहातून बाहेर पडले. तरीही नेतान्याहू यांनी त्यांचे भाषण चालूच ठेवले.

इराणच्या अणूप्रकल्पांचा उद्देश अमेरिकेला धमकावणे ! – नेतान्याहू

इराणचा अणूप्रकल्प केवळ इस्रायलचा नाश करण्यासाठी नाही, तर अमेरिकेला धमकावणे, तसेच जगभरातील देशांवर दबाव आणणे, हाही त्याचा उद्देश आहे, असेही नेतान्याहू या वेळी म्हणाले. ‘मी याआधी संयुक्त राष्ट्रांसमोर उभा होतो, तेव्हा इराण त्याचे अणू आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगाने वाढवत होता. त्याचे ‘प्रॉक्सी’ (प्रतिनिधी) असलेले हमास आणि हिजबुल्ला इस्रायलला सतत लक्ष्य करत होते; पण आता इस्रायलने हे धोके दूर केले आहेत’, असेही ते म्हणाले.

नेतान्याहू यांनी अटक टाळण्यासाठी युरोपीय देशांच्या हवाई हद्दीतून जाणे टाळले !

युद्ध भडकवण्याचा आणि उपासमारीचा युद्धाचे शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. यामुळे नेतान्याहू यांनी फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड आणि युनायटेड किंगडम यांसह आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमांचे पालन करणार्‍या युरोपीय देशांच्या हवाई हद्दीतून जाण्याचे टाळले. यासाठी अमेरिकेला पोचण्यासाठी त्यांना ६०० किमी अधिक अंतर कापावे लागले.

तथापि इस्रायली सरकारने हा मार्ग निवडण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही; परंतु असे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

शत्रूला नष्ट करण्यासाठी वीजिगीषू वृत्ती बाळगणारे नेतान्याहू आणि त्यांचे इस्रायल राष्ट्र यांनी ‘जिहादी आतंकवाद कसा निपटून काढायचा’ याचा सांप्रतकाळात आदर्श प्रस्थापित केला आहे. भारताने त्याचा अंगीकार करावा !