खाडीत जलकुंभ बनवून विसर्जन करू द्या ! – आमदार जितेंद्र आव्हाड, शरद पवार गट

ठाणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) – लोकांच्या भावना दुखवायच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचे, हेच सध्या चालू आहे. लोखंडी टाक्यांमध्ये गणपतीच्या मूर्ती विसर्जन करायला न्यायालयाने सांगितलेले आहे का ? खाडीमध्ये एका बाजूला जलकुंभ बनवा. त्यात विसर्जन करायला द्या. लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याविषयी मला राजकारण करायचे नाही; म्हणून मी काही करत नाही, नाहीतर एकही मूर्ती विसर्जित होऊन दिली नसती. अधिकाधिक पोलिसांनी कारवाई केली असती, फाशी तर देणार नाहीत ना ? असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

आव्हाड पुढे म्हणाले की,

१. कुठल्या व्यवस्थेने सांगितले आहे की, शाडूच्या मातीच्या मूर्ती खाडीत विसर्जित करायच्या नाहीत ? तर या विरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते ना ! लोकांच्या भावनांची तरी कदर करायला हवी होती ना. लोकांच्या भावनांशी खेळ चालू आहे. टँकर बनवायचे आणि नंतर त्या मूर्ती ट्रकने कुठे नेतात, हे सांगायला डायघर येथे घडलेली घटना ताजी आहे.

२. लोकांनी गौरी पूजनासाठी वापरलेल्या झाडपाल्याने (निर्माल्यामुळे) खाडी खराब होते, असे सांगितले जाते; मात्र आज मोठ्या प्रमाणात खाड्या प्रदूषित झाल्या आहेत.  मलनि:स्सारणाचे पाणी (सिव्हरेज) वर्षानुवर्षे खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीचे बारा वाजले, त्याविषयी बोला ! अनधिकृत बांधकामांमुळे खाडीचा नाला झाला, त्यावर बोला. त्यावर मौन बाळगले जात आहे. पूर्वी खाडीमध्ये मासेमारी केली जायची; मात्र सध्या खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून एखाद्याने उडी मारली, तरी त्याचा गुदमरून मृत्यू होईल, अशी स्थिती आहे.

३. पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये, या मताचे आम्ही आहोत; परंतु त्याला पर्यायी व्यवस्था आहे. त्या करायला हव्यात. आज हे सगळे पहायला बरे वाटत असले, तरी एक दिवस याविरोधात बंड झालेले असेल.