
एकेकाळी ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ती ओळख पुसली जाऊन आज पुणे म्हणजे ‘आय.टी.’चे माहेरघर, अशी झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे ‘शांत, संस्कारी पुणे’, ही ओळखसुद्धा पुसली गेली आहे. हिंजवडी येथील ‘आय.टी.’ आस्थापनांमुळे हिंजवडी ग्रामपंचायतीचा परिसर हा नवीन आलेले छोटे मोठे उद्योगधंदे, गगनचुंबी इमारती आणि नव्याने तेथे रहाण्यासाठी आलेले देशाच्या विविध भागांतील कर्मचारी यांमुळे गजबजला गेला आहे. रहदारी पूर्वीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यामध्ये रहदारी वाढली असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. रस्त्यावरून पायी जाणेसुद्धा अशक्य झाले आहे. पूर्वी पुण्याच्या कोणत्याही भागातून हिंजवडीला पाऊण घंट्यामध्ये जाता येत असे; परंतु आज त्यासाठी २ ते अडीच घंटे लागत आहेत. व्यक्ती मुंबईवरून हिंजवडीला २ ते ३ घंट्यामध्ये पोचते; परंतु तेथून पुण्याच्या कोणत्याही भागामध्ये जाण्यासाठी २ ते अडीच घंटे लागत आहेत, म्हणजे हिंजवडी येथील आस्थापनामध्ये काम करण्यार्या कर्मचार्याचे ४ ते ५ घंटे प्रतिदिन प्रवासामध्येच जात आहेत. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे.

खरे तर आस्थापने वाढतात, तेव्हा त्यासमवेत संबंधित कर्मचार्यांची संख्या वाढून त्याचा सर्व प्रकारचा भार आजूबाजूच्या परिसरावर पडतो. त्याचे दायित्व ती आस्थापने आणि संबंधित गावाचे प्रशासन यांनी मिळून घ्यायला हवे. यासाठी रस्ते रूंदीकरण करून दळणवळण सुलभ करणे आवश्यक आहे. ‘रस्ते रूंदीकरणासाठी तेथील सरपंचांचा विरोध आहे’, असे समजते. या सर्व कारणांमुळे काही आस्थापने दुसर्या शहरामध्ये स्थलांतरित झाली आहेत, तर अजून काही स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे. असे झाले, तर त्याचा परिणाम स्थानिक व्यवसायावर होऊन बेकारी वाढणार आहे. यासाठी शासनाने हिंजवडीच्या परिसरात तेथे सोयीसुविधा उपलब्ध करून जनजीवन सुरळीत कसे होईल ? ते पहाणे अपेक्षित आहे; परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. का ? ‘यामुळे निवडणुकीत अपयश येईल’, असे ऐकण्यात आहे. खरे तर लोकप्रतिनिधींचे काम काय, तर लोकांना सुविधा देऊन त्यांचे दैनंदिन जीवन सुखकारक करणे; परंतु या ठिकाणी असे लक्षात येते की, यांना लोकांच्या अडचणी सोडवण्यामध्ये रस नाही, तर वैयक्तिक स्वार्थ कसा साधता येईल ? याकडेच आहे. अशा राजकारण्यांना लोकांनीच योग्य तो धडा शिकवणे अपेक्षित आहे. ज्या दिवशी शासनकर्त्यांना जाग येईल तो सुदिन, असे म्हणावे लागेल.
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !