NCERT On Partition : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकात जोडण्यात आले फाळणीच्या भयावहतेचे प्रकरण !

फाळणीसाठी काँग्रेस, जिना आणि माऊंट बॅटन दोषी असल्याचा उल्लेख

(‘एन्.सी.ई.आर्.टी.’ म्हणजे ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)  

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता ६ वी ते ८ आणि ९ वी ते १२ वी साठी २ नवीन प्रकरणांचा समावेश केला आहे. ही दोन्ही प्रकरणे देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर आधारित आहेत. या प्रकरणांमध्ये म्हटले आहे की, महंमद अली जिना यांनी फाळणीची मागणी केली, काँग्रेसने ती मान्य केली आणि व्हॉईसरॉय माऊंट बॅटन यांनी ती कार्यवाहीत आणली.

ही माहिती ‘फाळणीचे गुन्हेगार’ या विषयावर जोडण्यात आली आहे. ही प्रकरणे अभ्यासक्रमाचा भाग नाहीत, ते पूरक साहित्य आहे, जे मुलांना विशिष्ट विषय समजावून सांगण्यासाठी सिद्ध केले जाते. ते पत्रके, चर्चा आणि वादविवाद यांद्वारे मुलांना शिकवले जाते. अलीकडेच ‘ऑपरेशन सिंदूर’ही विशेष प्रकरणाद्वारे जोडण्यात आले आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, व्हॉईसरॉय माऊंट बॅटन व महंमद अली जिना

फाळणी स्वीकारावी लागेल किंवा अराजकतेला तोंड द्यावे लागेल ! – नेहरू

या प्रकरणामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणातील एक उतारा समाविष्ट करण्यात आला आहे. यात नेहरू म्हणाले होते, ‘आपण अशा परिस्थितीत पोचलो आहोत, जिथे आपल्याला एकतर फाळणी स्वीकारावी लागेल किंवा सतत संघर्ष आणि अराजकतेला तोंड द्यावे लागेल.’ (नेहरूंनी फाळणी केली; मात्र देशात सतत संघर्ष आणि अराजकता या दोन्ही गोष्टी तेव्हापासून आतापर्यंत चालू असून त्या पुढेही चालू रहाणार आहेत, म्हणजेच फाळणी करून भारताच्या हातात काहीच साध्य झाले नाही, उलट देशाची हानी झाली आणि आजही होतच आहे. हे काँग्रेस आणि गांधी-नेहरू यांचे पाप आहे ! – संपादक)

फाळणीच्या दुष्परिणामांचा उल्लेख

या प्रकरणामध्ये म्हटले आहे की, वर्ष १९४७ ते १९५० या काळात फाळणीने भारताच्या एकतेला तडा दिला, शत्रुत्वाच्या सीमा निर्माण केल्या, सामूहिक हत्याकांड आणि विस्थापन घडवून आणले, धार्मिक अविश्वास वाढवला, पंजाब अन् बंगाल यांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्या, जम्मू-काश्मीरला सामाजिक, आर्थिक, तसेच लोकसंख्या शास्त्रीय पतनाच्या मार्गावर आणले, जे नंतर आतंकवादामुळे आणखी वाईट झाले.

फाळणीचे दुःख कधीही विसरता येणार नाही ! – पंतप्रधान मोदी

विशेष प्रकरणाच्या प्रस्तावनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फाळणीविषयीचे विचारही मांडण्यात आले आहेत. यात मोदी म्हणतात, ‘फाळणीचे दुःख कधीही विसरता येणार नाही. लोकांचा मूर्खपणा आणि द्वेषपूर्ण हिंसाचार यांमुळे आपल्या लाखो बहिणी-भाऊ विस्थापित झाले अन् अनेकांना प्राण गमवावे लागले. संघर्ष आणि बलीदान यांच्या स्मरणार्थ भारतीय १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणीचा भयपट स्मृतिदिन’ म्हणून साजरा करतील.’