सनातन संस्थेच्या वतीने वर्ष २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१०.७.२०२५ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्यानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या विविध गुरुपौर्णिमा महोत्सवांच्या निमित्ताने प्रसार करतांना आणि गुरुपौर्णिमा महोत्सवांच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. सौ. किरण सक्सेना (वय ६७ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे. 

१ अ. ‘प.पू. भक्तराज महाराज ग्रंथप्रदर्शनस्थळी येऊन गेले’, असे जाणवणे : ‘मला ग्रंथप्रदर्शन कक्षात सेवा होती. मी तेथे सेवा करत असतांना माझ्यासमोर एक वयस्कर व्यक्ती येऊन उभी राहिली. ती मान खाली घालून ग्रंथांकडे पहात होती. तिने टोपी घातलेली असल्याने मला तिचा चेहरा दिसत नव्हता. त्या व्यक्तीने प.पू. भक्तराज महाराज घालायचे, तसा कोट घातला होता. ती व्यक्ती २ – ३ मिनिटे तशीच उभी होती. ती व्यक्ती प्रदर्शनकक्षातून गेल्यानंतर ‘प.पू. भक्तराज महाराजच येऊन गेले’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.’

२. श्री. शिवराज डोणवाडे, सिंहगड रस्ता, पुणे.

२ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना आनंद होणे : ‘मी प्रथमच गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारसेवा करत होतो. समाजातील व्यक्तींकडे अर्पण मागायचे असतांना माझ्या मनात ‘मला जमेल का ?’, असा विचार येऊन मला ताण आला. तेव्हा २ साधकांनी मला ‘अर्पणाविषयी माहिती कशी सांगायची?’, हे समजावून सांगितले. मी वेळोवेळी गुरुदेवांना शरण गेल्यामुळे मला अर्पणाविषयी सांगता आले आणि मला सेवेतून आनंद मिळाला.

२ आ. उद्घोषणा करण्याची सेवा करत असतांना ‘गुरुदेवांना साधकांची किती काळजी आहे ! ’, याची प्रचीती येणे : मी उद्घोषणा करण्याची सेवा करत होतो. माझे हात ध्वनीक्षेपक (स्पीकर) पकडून दुखत होते. नंतर मी ‘गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा करूया’, असा निश्चय केला. तेव्हा प्रसारात प्रत्येक ठिकाणी ध्वनीक्षेपक ठेवण्यासाठी आम्हाला जागा मिळाली. त्या वेळी ‘गुरुदेवांना साधकांची किती काळजी आहे ! ’, याची मला प्रचीती आली.’

३. सौ. श्रुतिका कालमित्रा, भोसरी, पुणे.  

३ अ. विमा शाखेत आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला एकाच वेळी जायचे असल्याने मनाची द्विधा स्थिती होणे आणि गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर विमा शाखेत जाणे रहित होऊन गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाता येणे : ‘मला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच विमा (इन्शुरन्स) कार्यालयाच्या शाखेत बोलावले होते. ‘विमा शाखेत आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला एकाच वेळी कसे जायचे ?’, अशी माझ्या मनाची द्विधा स्थिती झाली होती. मी माझ्या मनाची स्थिती एका साधिकेला सांगितली. त्यांनी मला गुरुदेवांना प्रार्थना करायला सांगितले. मी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर माझे शाखेत जाणे रहित झाले आणि मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाऊ शकले.

३ आ. यजमानांना एका कारणानिमित्त सभागृहात यावे लागणे आणि ते गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित असणे : मला कार्यक्रमस्थळी पोचवून माझे यजमान गाडीत पेट्रोल भरायला गेले. तेव्हा माझ्या मनात ‘त्यांनी परत येऊन कार्यक्रम पहावा’, असा विचार आला. त्याच वेळी यजमानांना त्यांच्या भ्रमणभाषचे ‘चार्जिंग’ संपल्याने ‘पॉवर बँक’ (भ्रमणभाषची ‘बॅटरी’ भारित करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘पोर्टेबल’ उपकरण) घेण्यासाठी कार्यक्रमाच्या सभागृहात माझ्याकडे यावे लागले. तेव्हा यजमानांनी संपूर्ण कार्यक्रम पाहिला.

या दोन्ही अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

४. सौ. अयोध्या देसाई, भोसरी, पुणे.

अ. ‘माझी नोकरी नवीनच असल्याने ‘मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुटी मिळेल का?’, असे वाटत होते. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करून कार्यालयातील साहेबांना गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली. त्यांनी माहिती ऐकून मला त्वरित सुटी दिली.

आ. एक साधिका स्वतःची चूक सांगत असतांना ‘साधक स्वतःच्या चुका किती सहजतेने स्वीकारतात’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझा सेवेविषयी आत्मविश्वास वाढला.’

५. कु. दर्श तावरे (वय १३ वर्षे), भोसरी, पुणे.

अ. ‘कार्यक्रमाच्या आरंभी गुरूंचा श्लोक म्हणतांना ‘प.पू. गुरुदेव माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला जाणवले.

आ. बसमधून कार्यक्रमस्थळी जातांना ‘गुरुमाऊली, सर्व साधक सभागृहात सुखरूप पोचू देत’, अशी मी प्रार्थना केली आणि कार्यक्रमानंतर ‘गुरुमाऊली, तुमच्यामुळे कार्यक्रम चांगला झाला’, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

इ. माझे मित्र मला ‘सभागृहाच्या बाहेर जाऊया’, असे सतत म्हणत होते; पण मी त्यांना ‘मला कार्यक्रम पहायचा आहे’, असे सांगितले आणि मी सभागृहातच बसून संपूर्ण कार्यक्रम पाहिला.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २८.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक