साधनेचे मौलिक दृष्टीकोन

ग्रंथाचे संकलक : हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

मनोगत

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांच्या शिकवणीनुसार सनातनचे साधक व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली साधना आणि समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली साधना. या साधना करतांना साधकांना येणार्‍या अडचणींवर त्यांना योग्य दृष्टीकोन समजले, तर त्यांची साधना अधिक चांगली व्हायला साहाय्य होते. प्रस्तुत ग्रंथामुळे हे साध्य होऊ शकेल. कोणत्याही साधनामार्गानुसार किंवा संप्रदायानुसार साधना करणार्‍यांनाही हा ग्रंथ तेवढाच उपयुक्त ठरेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष २०१२ पासून मला आध्यात्मिक त्रास होण्यास आरंभ झाला. यात प्रामुख्याने शारीरिक क्षमता न्यून होण्यासह मनाची अस्वस्थता वाढणे, उत्साह न्यून होणे, मन एकाग्र न होणे, काही वेळा न सुचणे यांसारखे त्रासही होत असत. या सर्वांचा परिणाम म्हणून साधनेचे प्रयत्न करण्यासाठीही मनाचा संघर्ष करावा लागत असे. ‘जीवनात संघर्ष असला, तरच मनुष्याचा खरा कस लागतो’, असे म्हणतात. संघर्षरूपी वादळामुळे खवळलेल्या जीवनसागरात साधनेची नौका डगमगू न देता पैलतिरी नेण्यासाठी माझ्या साधनेचाही कस लागला; मात्र यातूनच मी मनाचा अभ्यास अन् साधनेविषयी अधिक चिंतन करायला शिकलो. मला त्या त्या वेळच्या मनाच्या स्थितीनुसार आणि उद्भवलेल्या प्रसंगांनुसार साधनेचे विविध पैलू उलगडत गेले.

अशा प्रकारे साधना चांगली होण्यासाठी शिकता आलेले आवश्यक दृष्टीकोन मी वेळोवेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून प्रसिद्धीस दिले. ‘सनातन प्रभात’मध्ये माझे लिखाण वाचल्यावर अनेक साधक मला सांगतात, ‘‘तुमचे लिखाण पुष्कळ आवडले. असे वाटते की, तुमचे लिखाण माझ्यासाठीच होते. नेहमी असे घडते की, माझ्या मनात प्रश्न निर्माण झाल्यावर १ – २ दिवसांतच त्याचे उत्तर तुमच्या लिखाणातून मला मिळते.’’ एका साधकाने सांगितले, ‘‘सनातन प्रभात’मधील तुमच्या लिखाणाच्या चौकटीचे कात्रण काढून मी माझ्या खिशात ठेवतो. दिवसभरात मधे मधे मी ती चौकट वाचतो.’’ सनातनच्या बहुतांशी धर्मप्रचारक संतांनी मला सांगितले, ‘‘आम्ही तुमच्या चौकटीत सांगितल्यानुसार साधकांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतो.’’ एकदा माझी ओळख नसलेला आणि नुकताच साधनेला लागलेला एक साधक सनातनच्या रामनाथी आश्रमात साधना शिबिरासाठी आला होता. तो अक्षरशः रडत कृतज्ञता व्यक्त करत मला म्हणाला, ‘‘काही कारणामुळे माझ्या मनात समष्टी साधनेविषयी विकल्प आला होता; पण तुमची समष्टी साधनेविषयीची चौकट वाचल्यावर माझे विकल्प दूर होऊन मनाला उभारी आली आणि मी या शिबिरासाठी आलो.’’

पू. संदीप आळशी

या सर्व अनुभवांवरून ‘या सर्व चौकटींचा ग्रंथ प्रसिद्ध करायला हवा’, असे प्रकर्षाने वाटले. स्थुलातील महाभीषण आपत्काळाला आता लवकरच आरंभ होणार आहे. त्यापूर्वीच साधकांना साधनेचे दृष्टीकोन चांगल्या प्रकारे कळून त्यांची साधना चांगली होणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीनेही हा ग्रंथ लवकर प्रसिद्ध होणे आवश्यक होते.

या ग्रंथातील बरेचसे लिखाण मला परिस्थिती किंवा प्रसंग यांनुसार त्या त्या वेळी सुचलेले असले, तरी त्या लिखाणातील विचारांचा मूळ गाभा हा माझ्या गुरुदेवांनी शिकवलेल्या साधनेतच आहे. गुरुदेवांनी वेळोवेळी केलेल्या साधनेविषयीच्या मार्गदर्शनामुळे माझ्या चित्तात साठवले गेलेले ज्ञानच या चौकटींच्या निमित्ताने प्रगट झाले, हेच खरे आहे. ‘जसे बोलविसी प्रभु तू अनंता । तसे या जना मार्ग दावीन आता ।।’, असा माझा गुरुदेवांप्रती भाव असल्यामुळे सर्व ज्ञान गुरुदेवांच्याच कृपेमुळे मला ज्ञात झाले आहे. त्यामुळे शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, ‘इदं न मम ।’

(अर्थ : हे माझे नाही.) हा ग्रंथ गुरुदेवांच्या चरणी अर्पण !

गुरुदेवांनी या ग्रंथात शिकवलेले साधनेचे दृष्टीकोन जे मनापासून आचरणात आणतील, त्यांची साधना चांगली होऊन साधनेत शीघ्र आध्यात्मिक उन्नती निश्चितच होईल. ‘असे सर्वच साधकांच्या बाबतीत होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– (पू.) संदीप आळशी (३.१.२०२५)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक