राष्ट्रसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य द्या ! – CDS Anil Chauhan

तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांचे कारगिल विजय दिवसानिमित्त शुभेच्छा देतांना देशवासियांना आवाहन

तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

नवी देहली – ‘कारगिल विजय दिवस’ हा केवळ इतिहास आठवण्याचा दिवस नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याची संधी आहे.

प्रत्येक नागरिकाने आपापल्या कर्तव्यांप्रती सजग राहिले पाहिजे आणि राष्ट्रसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. हीच आपल्या वीर सैनिकांप्रती खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख) जनरल अनिल चौहान यांनी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तानच्या कपटाचीही सत्यकथा

जनरल चौहान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, कारगिल युद्ध ही केवळ शौर्याची गोष्ट नाही, तर पाकिस्तानच्या कपटाचीही सत्यकथा आहे. शत्रूच्या सैन्याने आतंकवाद्यांच्या वेषात त्याचे प्रशिक्षित सैनिक उंच पर्वतरांगांवर पाठवले होते आणि आधीच तिथे नियंत्रण मिळवून गोळीबाराच्या जागा सिद्ध केल्या होत्या. तरीही आपल्या सैनिकांनी सरळ उभ्या डोंगरावर चढत, बर्फाळ वार्‍यांचा आणि गोळीबाराचा सामना करत, जिवाची पर्वा न करता विजय मिळवला. हे आपल्या सैनिकांच्या असामान्य शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाने सैनिकांचे शौर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.