मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन ! – JNU VC Santishree Pandit

  • मराठी भाषेच्या वादावर जेएनयूच्या कुलगुरूंनी मांडले मत !

  • मोगलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य होते, असेही केले स्पष्ट

‘जेएनयू’च्या कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित

नवी देहली – मराठी भाषेमध्येही इतर भाषांप्रमाणेच संकल्पना आहेत. त्यामध्ये वेगळेपणा आहे. मोगलांना विरोध करणारे साम्राज्य ‘मराठा साम्राज्य’ होते. त्यामुळे इतिहासाचा हा भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (‘जेएनयू’च्या) कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी मांडले. महाराष्ट्रात चालू असलेल्या हिंदी-मराठी भाषांवरील वादावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. मराठी भाषेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन; कारण मातृभाषा ही सर्वांत महत्त्वाची आहे. इतर २ भाषा तुमच्या व्यवहारातील भाषा असायला हव्यात.’

कुलगुरु प्रा. शांतिश्री पुढे म्हणाल्या की,

१. तुम्ही कुठेही रहा, स्थानिक भाषा आणि तुमच्या व्यवसायाची (करिअरची) भाषा शिका. हा नागरिकांचा वैयक्तिक निर्णय असायला पाहिजे.

२. भारतातील सर्वच भाषा चांगल्या आहेत. बहुभाषिकतेमध्ये संख्या महत्त्वाची नाही. भाषा द्वेष किंवा श्रेष्ठता यांचे साधन असू नये. ती संवादाची भाषा असली पाहिजे.

३. मी सर्वांना भारतातील प्रत्येक भाषा शिकण्यास प्रोत्साहित करते, जिथे इतके विशाल साहित्य आणि संपत्ती आहे. जरी भारतीय साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले गेले असले, तरी आपण एक आहोत.