हिंदु मंदिरांमध्ये दर्शन रांगेविषयी दिसून येणारी दुःस्थिती !

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

मी नुकतीच महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे’ दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे पुष्कळ गर्दी होती. काही लोक दर्शन घेण्यास लांबून आले होते. आम्ही दर्शन घेण्यास रांगेत उभे राहिलो असता ‘मंदिरात प्रवेश करण्याची जी रांग आहे, ती नियोजनबद्ध नाही’, असे वाटले. तेथील रांगेची व्यवस्थाच अशी होती की, मला वाटले, ‘देवाचे एक क्षण जरी दर्शन झाले, तरी आपले भाग्य समजावे !’ लोक रांगेत घंटोन्‌घंटे उभे रहातात; पण त्यांना देवाचे दर्शनही नीट घेता येत नाही, अशी स्थिती होती.

मी साधारण सकाळी ९ वाजता मंदिरात पोचले; परंतु गर्दीमुळे जवळजवळ २ घंटे थांबावे लागले. रांग पुढे सरकून जसे मी दर्शनाच्या मंडपात आले, तसतसे लोक एकमेकांना ढकलू लागले. जेव्हा प्रत्यक्ष गर्भगृहात दर्शन घेण्याची वेळ आली, तेथे आजूबाजूला पोलीस उभे होते. ते लोकांना पुढे जाण्यासाठी सांगतांना ‘पटापट दर्शन घ्या !’, असे सांगणे तितकेसे रूचले नाही; कारण ते दर्शनही व्यवस्थित होऊ न देता लोकांना केवळ पुढे पुढे ढकलत होते. याचा अर्थ भाविकांना देवासमोर डोके टेकवायलाही एक क्षण मिळत नाही आणि घाईघाईत पुढे ढकलले जाते. काही भाविक डोके टेकवून नमस्कार करत होते, त्याच वेळी मी हाताने अक्षरशः पुढे खेचले गेले. मला पोलिसांचे हे वागणे पटले नाही. मंदिरात भाविक देवाच्या दर्शनासाठी, त्याचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी येतात; परंतु जर त्या भाविकाला देवाचे चैतन्य अनुभवताच येणार नसेल, तर त्याचा तेथे जाऊन तो ते अनुभवणार कसा ? प्रशासनाने जनतेच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा. ज्या प्रकारे दुचाकी वाहनाच्या टायरमध्ये हवा संपल्यावर आपण पेट्रोल पंपावर जाऊन हवा भरतो, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाला भगवंतासमोर एका विशिष्ट स्थानावर डोके ठेवून अथवा भावपूर्ण नमस्कार करून चैतन्य नको का ग्रहण करायला ?

दर्शन रांगेचे मंदिर ट्रस्ट आणि भक्त यांनी नियोजन करणे आवश्यक !

मंदिरात जरी गर्दी असली, तरी योग्य नियोजन करून गर्दी हाताळता येऊ शकते. भाविक, भक्तगण दूरचा प्रवास करून देव दर्शनासाठी येतात, तर त्यांना व्यवस्थित समाधान मिळेल, अशी दर्शन व्यवस्था करायला नको का ? पोलीस भाविकांना नमस्कार करण्यापूर्वीच पुढे ढकलतात, याला काही अर्थ नाही. अशा व्यवहारामुळे भाविकांचेही मन दुखावले जाते, याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. असे प्रसंग अनेक मंदिरांमध्येही होत असतात; परंतु यावर मंदिर ट्रस्ट आणि भक्त यांनी एकत्रित येऊन उपाययोजना काढायला हवी; कारण भाविकांना देवाचे व्यवस्थित दर्शन न मिळाल्याने हिंदु भाविकच मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणे टाळतात, याहून दुःखदायक गोष्ट कोणती ?

– कु. म्रिणालिनी देवघरे, फोंडा, गोवा. (४.७.२०२५)