वारीचे राजकारण : श्रद्धेचा अपमान !

पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील एक महान आध्यात्मिक परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी, विठ्ठलनामाच्या भक्तीत लीन होऊन, एकच ध्यास मनात ठेवून ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या गजरात पंढरीची वाट चालतात. ही केवळ चाल नाही, ही चाल आहे श्रद्धेची, भक्तीची आणि आत्मिक शुद्धीची ! गेल्या काही वर्षांपासून या पवित्र वारीमध्ये राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप दिसून येत आहे. अनेक नेते केवळ प्रसिद्धीसाठी वारीत सहभागी होतात. त्यांची उपस्थिती, मोठ्या ताफ्याने होणारी मिरवणूक, पोलीस बंदोबस्त आणि राजकीय भाषणे यांमुळे वारीचे पावित्र्य अन् भक्तीचा निखळ भाव हरवत चालला आहे.

जे वारकरी खर्‍या अर्थाने निष्ठा आणि भक्तीने वारी करत होते, त्यांना आता या सर्व गोंधळामुळे दूर वाटू लागले आहे. साधेपणाचा, समतेचा आणि संयमाचा संदेश देणार्‍या या वारीमध्ये जेव्हा पैसा, प्रसिद्धी आणि राजकारण यांचा शिरकाव होतो, तेव्हा खरी श्रद्धा अल्प होत जाते.

वारी जनतेच्या मनाशी जोडलेली आहे, निवडणुकीच्या प्रचाराशी नाही. त्यामुळे वारीच्या या आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेला आपण सर्वांनी मिळून राजकारणापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. विठ्ठल भक्तीमध्ये ढोंग नको, श्रद्धा पाहिजे, सोहळा नको !

– श्री. विजय विष्णु होबळे, वीर सावरकर युवा मंच, डिचोली, गोवा.