Sri Lanka Accuses India : श्रीलंकेचा भारतविरोधी सूर – मासेमारांवर लूटखोरीचा आरोप !  

कच्चाथीवू बेटावरील नियंत्रण सोडणार नसल्याचेही केले स्पष्ट

श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ

कोलंबो (श्रीलंका) – कच्चाथीवू बेटाच्या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी आमच्याकडे राजनैतिक पर्याय उघडे आहेत; परंतु आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कच्चाथीवू बेट श्रीलंकेचा एक भाग आहे आणि आम्ही ते कधीही सोडणार नाही, असे विधान श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ यांनी केले.

या बेटाजवळील सागरात भारतीय मासेमार घुसखोरी करून मासेमारी करत असल्याचा आरोपही हेराथ यांनी केला. ‘भारतीय मासेमार  केवळ येथील संसाधनांची लूट करत नाहीत, तर सागरी वनस्पतींचीही हानी करत आहेत’, असाही आरोप त्यांनी केला. भारताच्या मासेमारांना श्रीलंकेकडून केल्या जाणार्‍या अटकेवरून ते बोलत होते.

काय आहे इतिहास ?

कच्चाथीवू बेट भारताच्या रामेश्वरमपासून १९ कि.मी. अंतरावर आहे. भारतातील तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यातील समुद्राला पाल्क सामुद्रधुनी म्हणतात. येथे अनेक बेटे आहेत, त्यांपैकी एकाचे नाव कच्चाथीवू आहे. हे २८५ एकरमध्ये पसरलेले बेट आहे. हे बेट बंगालच्या उपसागराला आणि अरबी समुद्राला जोडते. वर्ष १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने हे बेट श्रीलंकेला भेट म्हणून दिले. १९८० च्या दशकात भारत दक्षिण आशियात आपला प्रभाव वाढवण्याच्या आणि शेजारील देशांशी शांततापूर्ण संबंध राखण्याच्या धोरणावर काम करत होता. श्रीलंकेसमवेतचा सीमावाद सोडवणे, हा या योजनेचा एक भाग होता. त्या योजनेअंतर्गत हे बेट श्रीलंकेला देण्यात आले. याचा तेव्हा तमिळनाडू सरकारने विरोध केला होता.

संपादकीय भूमिका

भारताने केलेल्या गांधीगिरीला सगळीकडून कृतघ्नताच परत मिळत असते, हे श्रीलंकेनेही दाखवून दिले. आतातरी भारत शहाणा होणार आहे का ?