Pakistan Trade Ban : भारताच्या कठोर निर्णयाचा परिणाम : पाकिस्तानमध्ये वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ !

नवी देहली – पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर भारताच्या कठोर निर्णयाचा परिणाम पाकिस्तानवर दिसू लागला आहे. भारतीय बंदरांवर पाकिस्तानी माल वाहून आणणार्‍या मालवाहू जहाजांच्या थांबण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसत आहे. माल पोचण्यात होणार्‍या विलंबामुळे पाकिस्तानमध्ये वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. सध्याच्या घडीला माल पोचण्यास ३० ते ५० दिवसांचा विलंब होत आहे. (पाकिस्तान भारताच्या विरोधात अपप्रचार करण्याचेही धाडस करणार नाही, अशी कठोर पावले भारताने उचलणे अपेक्षित आहे ! – संपादक)

१. २ मे या दिवशी लागू करण्यात आलेल्या या बंदीनुसार पाकिस्तानमधून येणारा किंवा पाकिस्तानमार्गे जाणारा कोणताही माल भारतात थेट किंवा अप्रत्यक्षपणे येण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

२. ‘कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे अध्यक्ष जावेद बिलवानी यांनी सांगितले की, मोठ्या मालवाहू जहाजांना भारतात प्रवेश न मिळाल्यामुळे आता लहान जहाजांवर  अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत आहे आणि माल पोचण्यास अधिक वेळ लागत आहे.

३. पाकिस्तानमधील काही निर्यातदारांनी सांगितले की, भारताच्या या बंदीमुळे थेट निर्यातीवर परिणाम झाला नसला, तरी वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

४. पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानमधून आयात होणार्‍या सर्व वस्तूंवर आयात शुल्क २०० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.