आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या संजय गांधींचे हुकूमशाही वागणे !

२५ जून १९७५ या दिवशी देशात ‘आणीबाणी’ लागू करण्यात आली होती. त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…

आणीबाणीतील (२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा कालावधी) अनेक वाईट गोष्टींपैकी एक पुष्कळच वाईट म्हणजे…एक वाया गेलेला, न शिकलेला आणि कोणतीही योग्यता नसलेला, २९ वर्षांचा बिघडलेला मुलगा भारतासारख्या देशावर हुकूम गाजवत होता. कोणताही मुख्यमंत्री अथवा मंत्री असो, कुणालाही पंतप्रधानांना भेटण्याच्या आधी या पोराला भेटणे अनिवार्य होते. केंद्रीय कॅबिनेट मंत्री पालटून स्वतःला हवे ते मंत्री तो नियुक्त करत होता. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मनमानी पद्धतीने नियुक्त्या करत होता, त्यांना अपमानित करत होता, दमदाटी करत होता. वाट्टेल त्याला अटक करणे आणि कारागृहात मारहाण होईल, असे ते पहात होता. उद्योजकांना निरनिराळ्या अनुमती आणि इतर सवलती देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करत होता. एकही विरोधी बातमी लागणार नाही, ते पहाणे आणि एखादी लागलीच, तर त्या पत्रकाराला ‘धडा’ शिकवत होता.

इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवण्यामागील हेही एक कारण !

श्री. भरत आमदापुरे

‘इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली; पण २ वर्षांनंतर त्यांनीच ती उठवून निवडणुका घेतल्या’, असे काँग्रेसी सांगतात; परंतु इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवण्यामागे त्यांची लोकशाहीप्रती निष्ठा नसून बांगलादेशातील शेख मुजीबूर रेहमान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी जे झाले, तेच आपल्याविषयीही होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.

– श्री. भरत आमदापुरे (२५.६.२०२५)

एकूणच काय, तर देशात कायद्याचे राज्य नाही, तर काँग्रेसचे संजय गांधींचे (इंदिरा गांधी यांचे पुत्र) राज्य आले होते. इतकेच नाही, तर या संजय गांधींनी नवीन घटना समितीच स्थापन करून राज्यघटना नव्याने लिहिली जावी, यासाठी प्रयत्न केले होते.

आज आपणही लोकशाही आणि लोकशाहीने देऊ केलेले मूलभूत स्वातंत्र्य गृहीत धरतो; पण लोकशाहीला कोणत्या अग्नीदिव्यातून जावे लागले आहे, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि आपल्या स्वातंत्र्याप्रती नेहमीच जागरूक राहिले पाहीजे.

– श्री. भरत आमदापुरे, अभियंता आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, पुणे. (२५.६.२०२५)