संपादकीय : पाकला धडा शिकवण्याची संधी ! 

पाकिस्तानने नुकतेच त्याचे संरक्षण अंदाजपत्रक (बजेट) २० टक्क्यांनी वाढवले आहे. ६३ अब्ज डॉलर्सच्या एकूण अंदाजपत्रकापैकी जवळपास १४.५ टक्के म्हणजेच ९.१७ अब्ज डॉलर्स संरक्षणावर खर्च करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. भारताने पाकसमवेत व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. तेथील महागाई गगनाला भिडली आहे. पाकिस्तान आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकीकडे सामान्य पाकिस्तानी जनता बेरोजगारी, महागाई, अन्नटंचाई आणि आरोग्यसुविधांचा अभाव यांनी त्रस्त आहे; तर दुसरीकडे हा देश २६९ अब्ज डॉलर्सच्या कर्जात बुडाला आहे. अशा परिस्थितीतही पाक सरकारने तेथील जनतेसाठी नाही, तर युद्धसज्जतेसाठी मोठा निधी राखून ठेवणे, हे धोकादायक आणि अकार्यक्षम धोरण आहे. भारताचे संरक्षण अंदाजपत्रक सध्या ७७ अब्ज डॉलर्स असून ते पाकिस्तानच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे; पण भारताने हे बजेट केवळ संरक्षणासाठीच नव्हे, तर संशोधन, तंत्रज्ञान, डिजिटल सुरक्षा आणि सीमा व्यवस्थापन यांसाठी वापरले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था वारंवार कोसळते आणि त्यानंतर जागतिक बँकेसारख्या संस्था कर्ज देऊन त्याला पुन्हा पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी पाकिस्तानने या संस्थांना दिलेल्या वचनांची पायमल्ली केली आहे. आता या संस्था जर का खरोखर पाकिस्तानला शिस्त लावू इच्छित असतील, तर आर्थिक दायित्व न पाळणार्‍या देशांवर कठोर धोरणे लावणे आवश्यक आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची मोठी हानी झाली आहे. भारतासमवेतच्या युद्धात पाकचा पराभव झाल्याने पाकिस्तानमध्ये लष्कराची विश्वासार्हता अल्प झाली आहे. त्यावर देशांतर्गत टीका होऊ लागल्याने लष्कराने सरकारवर पुन्हा दबाव आणायला प्रारंभ केला आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला असून चिनाब नदीवरील बगलीगार धरणाच्या पाण्याचा प्रवाह रोखला आहे. त्यामुळे पाण्याविना पाकची तडफड चालू आहे. पाण्याच्या सूत्रावरून पाकिस्तानात संसदेपासून लष्करापर्यंत बेचैनी दिसत आहे.

युद्धनीती काय सांगते, तर शत्रू शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल होत असेल, तर अधिक वेळ न दवडता त्याच्यावर वर्मी घाव घालून म्हणजे त्याच्याशी छुप्या पद्धतीने युद्ध करून त्याचा पराभव करणे किंवा त्या शत्रूचा नाश करणे आवश्यक आहे. असे केल्यास शत्रूराष्ट्राचे म्हणजे पाकचे अस्तित्व कायमचे संपेल. भारताने या परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता सतत सावध रहाणे, सीमा सुरक्षेत तंत्रज्ञान वापरणे आणि कूटनीतीद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. त्याचसमवेत जगाला पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय दिशाभूल दाखवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे पाकला धडा शिकवण्यासाठी भारताकडे मोठी संधी आहे. पाकची ‘ना घर का ना घाट का’, अशी स्थिती करून ठेवली पाहिजे. फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने भारताची मोठी हानी केली आहे. त्याचा सूड घेण्यासाठी भारताला आता मोठी संधी आहे, अन्यथा उद्या चीन, तुर्कीये आणि अन्य देशांतून मिळणार्‍या साहाय्याने पाकिस्तानची आर्थिक शक्ती वाढून तो सक्षम झाल्यास त्याचा मोठा तोटा भारताला होणार आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवे.

सैनिकी आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या पाकच्या वर्मी घाव घालण्याची संधी भारताने साधावी !