इंद्रायणीच्या पात्रात सोडला जात आहे गटाराचा मैला !

आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे इंद्रायणीमध्ये प्रक्रिया न करता सोडण्यात येत असलेले गटाराचे पाणी

पुणे, ७ जून (वार्ता.) – ज्या नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.

कुदळवाडी-चिखली येथून येणार्‍या गटारावरील जलशुद्धी प्रकल्पाची क्षमता अल्प आहे. मोठ्या क्षमतेचा प्रकल्प बसवण्याची मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र कार्यवाही झालेली नाही. आषाढी-एकादशी वारी तोंडावर आली असतांनाही नदीपात्रात सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्यावरील प्रक्रियेची कार्यवाही अपूर्णच आहे.