माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे ! – संचालक हेमराज बागुल

रत्नागिरीत कोकण विभागस्तरीय २ दिवसांची पत्रकार कार्यशाळा

संचालक हेमराज बागुल

रत्नागिरी – स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी विकासाच्या अंगाने जाण्याची आवश्यकता असल्याने माध्यमे आणि सरकार यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासमवेतच माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांनी येथे केले.

पत्रकारिता तंत्रज्ञान आणि आशय या दोन्ही अंगाने मोठ्या प्रमाणात पालटली असल्याचे सांगतांना श्री. बागुल म्हणाले, ‘‘शिळा प्रेस ते डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या अंगाने माध्यमे समृद्ध झाली आहेत. नवे तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने पत्रकारितेला पूरक आहे . ते मारक नाही. या तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढवू शकतात. कोणतेही तंत्रज्ञान मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी वापरता येते. किंबहुना ते त्यासाठीच असते. तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे आपण ठरवावे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रकारितेत क्रांती झाली आहे.’’