बाणेर येथे अवैध कचरा प्रकल्पाच्या विरोधात भर पावसात मानवी साखळी करून नागरिकांचे आंदोलन !

महापालिकेने रस्ता नसतांना उभारला प्रकल्प !

पावसात आंदोलन करतांना नागरिक

पुणे – पुणे महानगरपालिकेने वर्ष २०१६ मध्ये बाणेर येथील कीर्ती गार्डन टेकडीजवळ रस्ता नसतांना, तसेच रस्त्याची जागा कह्यात नसतांना अवैध प्रकल्प उभारला. परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने नागरिकांनी प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रकल्प चालवला जात नसल्याने प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. जागा कह्यात नसतांना त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. या विरोधात सूस रोड, बाणेर विकास मंचच्या वतीने भर पावसात १ जून या दिवशी मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात बाणेर बालेवाडी पाषाण सूस परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या वेळी सूस रोड बाणेर विकास मंचचे विनायक देशपांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, बाळासाहेब भांडे, गणेश तापकीर, अधिवक्ता सत्या मुळे, पुष्कर कुलकर्णी, शैलेंद्र पटेल आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, ‘‘पालिका अवैध कामे कशी करू शकते ? याविषयी मला कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. जागेचा अपवापर करण्यात आला असल्याने हा प्रकल्प तातडीने बंद करावा, तसेच माझ्या जागेच्या रस्त्याचा अपवापर बंद करावा.’’

संपादकीय भूमिका

महापालिकेचा भ्रष्ट कारभार ! महापालिकाच अशा प्रकारे प्रकल्प उभारून नागरिकांना अडचणी निर्माण करत असेल, तर नागरिकांच्या अडचणी कोण सोडवणार ? याविषयी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !