Ulil Abshar Abdalla : आतंकवादाचा सर्वाधिक त्रास हिंदु, बौद्ध किंवा ख्रिस्ती यांना नाही, तर मुसलमानांना आहे !

इंडोनेशियाच्या नेहदलातुल उलेमा कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष के.एच्. उलील अब्शर अब्दुल्ला यांचा घरचा अहेर !

के.एच्. उलील अब्शर अब्दुल्ला

जकार्ता (इंडोनेशिया) – इस्लाममधील काही गट इस्लामच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे खरे आहे. इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे. मुसलमानांना  शांतता हवी आहे. मी भारतातून आलेल्या खासदारांना सांगितले की, आतंकवादाचा सर्वाधिक त्रास हिंदु, बौद्ध किंवा ख्रिस्ती यांना नाही, तर मुसलमानांना आहे. म्हणूनच मुसलमानांनी या समस्येला योग्यरित्या सामोरे जाणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती इंडोनेशियाच्या नेहदलातुल उलेमा कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष के.एच्. उलील अब्शर अब्दुल्ला यांनी केली. पाकपुरस्कृत आतंकवादाची माहिती देण्यासाठी भारताची शिष्टमंडळे अनेक देशांत गेले आहेत. इंडोनेशिया येथेही एक शिष्टमंडळ पोचले आहे. या शिष्टमंडळाने के.एच्. उलील अब्शर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर ते ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

आतंकवादाचे उच्चाटन केल्याविना आर्थिक आणि राजकीय स्थिरता येणार नाही !

अब्शर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील लोकांना शांतता आणि सौहार्द हवे आहे. आतंकवादाचे उच्चाटन केल्याविना आर्थिक आणि राजकीय स्थिरता येऊ शकत नाही. जर लोकांना धर्माची योग्य समज नसेल आणि हिंसाचाराला वैध ठरवण्यासाठी धर्माचा वापर केला जात असेल, तर ते खूप धोकादायक आहे. इंडोनेशियाचा इतिहास भारताच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडलेला आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील किती मुसलमान राजकीय नेते, धार्मिक नेते अशा प्रकारचे सत्य मांडतात आणि आतंकवाद्यांचा विरोध करतात ?