India Slams Pakistan In UN : पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकिस्तानला पुन्हा फटकारले !

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – नागरिक आणि आतंकवादी यांच्यामध्ये जो देश भेद करत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकला फटकारले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच भारत आणि पाक यांच्यात नुकताच झालेल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. तसेच भारतातील धार्मिक स्थळांना  जाणूनबुजून लक्ष्य केले. पाकिस्तानच्या भारतातील आतापर्यंतच्या आतंकवादी कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिक लक्ष्य ठरले; कारण पाकचा उद्देश आमची समृद्धी, प्रगती यांवर आक्रमण करणे आहे. पाकिस्तान आतंकवाद्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या अंतिम संस्कारमध्ये पाकिस्तान सैन्यातील अधिकारी, पोलीस आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते, त्याचा व्हिडिओ सर्व जगाने पाहिला आहे.

संपादकीय भूमिका

गेंड्याच्या कातडीच्या पाकला शब्दांचा कितीही मार दिला, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा कोडग्या पाकला शस्त्रांच्याच भाषेत कठोर उत्तर देत रहाणे आवश्यक आहे. यातूनच त्याचा नाश केला पाहिजे !