‘ऑपरेशन सिंदूर’चा युद्धविराम : अपसमज आणि कारणमीमांसा

‘ऑपरेशन सिंदूर’विषयी जाणून घेण्यापूर्वी गेल्या १० वर्षांत घडलेल्या घटना लक्षात घेऊन सरकारच्या युद्धविराम या निर्णयामागचा हेतू जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

१. गेल्या १० वर्षांत भारतामध्ये होत चाललेला पालट

वर्ष २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि केवळ देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात भारताचे वर्चस्व हळूहळू वाढत गेले. ‘भारत एक बलवान राष्ट्र आणि स्वावलंबी राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे’, याची जाणीव जगाला झाली. ‘जागतिक दबावाखाली वावरणारा भारत’ अशी जी भारताची प्रतिमा होती, ती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोडीत काढली गेली. जगातील आतंकवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय मोदींनी स्पष्ट करतांना ‘भारताचा सर्वांगीण विकास’ हे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट केले. ‘सबका साथ सबका विकास’ ही केवळ घोषणा न रहाता ते ध्येय असून त्या दिशेने दमदार वाटचालही चालू झाली. ‘आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या समर्थ या दिशेने अत्यंत वेगाने पुढे जाणारा देश’, असे भारताचे चित्र जागतिक स्तरावर स्पष्ट दिसू लागले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयवादामुळे.

श्री. दुर्गेश परुळकर

भारतीय नागरिकांमध्ये असलेली सुप्त शक्ती योग्य प्रकारे उपयोगात आणली जात नव्हती. मोदींनी या सुप्त शक्तीला ओळखून तिला योग्य दिशा दिली. त्यांच्या या ध्येयवादाला साथ देणारे त्यांना सहकारी लाभले. या जमेच्या बाजूकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगातील प्रत्येक राष्ट्र स्वतःचा स्वार्थ साधणारे आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘कोणतेही राष्ट्र कुणाचेही कायमचे मित्र असत नाही, तसेच कोणतेही राष्ट्र कुणाचेही कायमचे शत्रू असत नाही’, हा जागतिक सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पूर्वीच सांगितले होते. त्या सिद्धांताला अनुसरून वर्तन करण्याचा निर्धार मोदींनी केला. त्यामुळे भारत कोणत्याही देशाच्या दबावाला न जुमानता आपल्या ध्येयपथावरून वाटचाल करू लागला.  त्यामुळे मोदींनी वाघाची कातडी पांघरली आहे कि ते खरोखर वाघ आहेत ? हे पहाण्यासाठी ‘उरी (२०१६)’ आणि ‘पुलवामा (२०१९)’ येथे भारताच्या लष्करी सामर्थ्यावर आक्रमण चढवले. ‘आपल्या आत्मसन्मानाला धक्का लावणार्‍या आणि उद्दिष्टाच्या आड येणार्‍या कुणालाही आम्ही धडा शिकवू, हे जगाला कळावे म्हणून भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून स्वतःची प्रतिकारशक्ती जगाला दाखवली. ‘जगाच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही पाहू. आम्ही कुणालाही घाबरणार नाही’, असे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, त्यानुसार ते वागत  राहिले.

२. अमेरिका, पाश्चात्त्य राष्ट्रे (नाटो) आणि चीन यांचे भारताविरुद्धचे षड्यंत्र

अमेरिका, चीन यांसारख्या देशांना भारताचे हे वर्चस्व सहन होत नाही, तसेच हे दोन्ही देश विविध प्रकारची शस्त्रास्त्रे निर्माण करतात. त्यांनी निर्माण केलेली शस्त्रास्त्रे ते आतंकवाद्यांना विकतात. ‘आपण निर्माण केलेल्या शस्त्रास्त्रांना सातत्याने मागणी प्राप्त व्हावी’, या हेतूने जगात सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी आणि स्वतःचा धंदा चालावा’, असा विचार करून हे दोन्ही देश वागत राहिले. याच देशांनी आतंकवाद पोसला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच केलेले एक विधान त्याची साक्ष देते. ‘Well we have been doing this dirty work for America and the west for last more than thirty years.’ (आशय : आम्ही गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ अमेरिका आणि पाश्चात्त्य देश [नाटो] यांच्यासाठी हे [आतंकवादाचे] घाणेरडे काम करत आलो आहोत.)

भारताचे जगातील वाढते वर्चस्व रोखण्यासाठीच अमेरिका, पाश्चात्त्य राष्ट्रे (नाटो) आणि चीन यांना भारताविरुद्धचा आतंकवाद जिवंत ठेवायचा आहे. भारताच्या विरोधात गुपचूप असे कार्य करणारे देश आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसारख्या आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेल्या देशाला १ मिलियन डॉलर्सचे कर्ज दिले. तेवढे कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता पाकिस्तानची नसतांनाही ते देण्यात आले. या गोष्टीकडे दुर्लक्षित करता येत नाही. भारताने ‘आतंकवादी पाकिस्तानला अशा प्रकारचे साहाय्य करू नये’, असे मत व्यक्त केले; पण भारताच्या मताला बाजूला सारून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेले कर्ज, म्हणजे भारताचे आर्थिक आणि लष्करी बळ त्यात खर्ची झाले पाहिजे. त्यामुळे भारताची आर्थिक घोडदौड रोखता येईल आणि भारत लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान होत चालला आहे, त्याला खीळ घालता येईल. असाच हेतू आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा असावा. भारताने वारंवार ‘जगात वाढत चाललेला आतंकवाद संपवण्यासाठी आपण संघटित होणे नितांत आवश्यक आहे’, असे आवाहन जगाला केले; पण त्या आवाहनाकडे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दुर्लक्ष केले. आशिया खंडातील स्वतःचे वर्चस्व न्यून होत असल्याची जाणीव चीनला झाली असल्याने त्याने पहलगाममधील पर्यटकांवर आक्रमण करून हत्याकांड घडवण्यासाठी पाकिस्तानला छुपे साहाय्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३. भारताची युद्धविरामाची घोषणा देशातील नागरिकांना मिळालेला मोठा धक्का !

कोणतेही युद्ध किंवा लष्करी कारवाई ही शांत चित्ताने आणि बुद्धी स्थिर ठेवून करावी लागते. त्यासाठी धूर्तपणे योजना आखावी लागते. या सर्वांसाठी पुरेसा वेळही लागतो. तेवढा वेळ देऊन विचारांती ‘ऑपरेशन सिंदूर’ कृतीत आणले गेले. त्याचा प्रारंभच जोरदार झाला. या धुमश्चक्रीत भारताची सरशी होत गेली. छुपे युद्ध खेळण्याचा स्वभाव असलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करावर आक्रमण करण्याऐवजी नागरी वस्त्यांवर आक्रमण करून आंतरराष्ट्रीय नियमांच्या मर्यादा ओलांडल्या. भारताने मात्र सर्व प्रकारच्या मर्यादेत राहून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू ठेवले. भारताच्या तिन्ही सैन्यदलाने पाकिस्तानची पार दाणादाण उडवली. अखेरीस पाकिस्तान हतबल झाला आणि त्याने शस्त्रसंधी करण्यासाठी भारतासमोर गुडघे टेकले. भारत विजयी होत असतांनाच आणि त्याची कोणत्याही प्रकारची हानी होत नसतांना अचानकपणे युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. सरकारची नेमकी भूमिका न कळल्यामुळे देशातील जनता गोंधळात पडली. अचानक युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यामुळे भारत सरकारवर विशेषतः मोदींवर भारतीय जनता अप्रसन्न झाली. अशा प्रकारची युद्धविरामाची घोषणा मोदींकडून केली जाईल, अशी शंकासुद्धा कुणा भारतियांच्या मनात स्वप्नातही डोकावली नव्हती. भारत सरकारचा हा निर्णय भारतीय जनतेला मोठा धक्का ठरला.

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (११.५.२०२५)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/915145.html