|
मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत, तसेच पहार्यात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोन यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांत पहारा वाढवला आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन यांच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम चालू केली असून त्या अंतर्गत सागरी पहारा वाढवण्यात आला आहे. मासेमारांना सतर्क रहाण्यास आणि नौकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मासेमार नौकांच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर पडताळणी वाढवण्यात आली आहे.
नौदलाच्या परिसरात कुणी आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना दिल्या ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री![]() युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मासेमारांसमवेत नौदलाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले, ‘‘नौदल ठिकाणे, तसेच संवेदनशील ठिकाणी मासेमारांना न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात कुणी आल्यास ‘शूट टू किल’च्या (दिसताक्षणीच ठार मारण्याच्या) सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच मुंबईतील मासेमार नौकांचे सर्वेक्षण करून एका अॅपच्या साहाय्यानेे त्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. पकिस्तानकडून गुजराती मासेमारांच्या काही नौका कह्यात घेण्यात आल्या असून मासेमारांना सोडून नौका जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणाप्रमाणे या नौकांचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नौदलाने दक्षतेची चेतावणी दिली आहे.’’ |