‘Operation Sindoor’ Not Over : ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही ! – संरक्षणमंत्री


नवी देहली – पाकविरुद्ध चालू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही चालूच आहे. ६ मेच्या उत्तररात्री पाकमधील ९ ठिकाणी झालेल्या हवाई आक्रमणानंतरही कारवाई थांबलेली नाही, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कक्षात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही या विधानाचा पत्रकारांशी बोलतांना पुनरुच्चार केला.

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, असदुद्दीन ओवैसी आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसकडून भारताच्या कारवाईस पाठिंबा !

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, या संकटात आम्ही देश आणि सरकार यांच्यासमवेत आहोत. सरकारवर टीका करण्याची आवश्यकता नाही. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. काही गोष्टी आहेत, ज्यांवर मी चर्चा करू इच्छित नाही. (याला ‘पूर्ण पाठिंबा’ म्हणायचा का ? – संपादक)

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध कारवाई करा ! – ओवैसी

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’साठी मी आपल्या सशस्त्र दल आणि सरकार यांचे कौतुक केले आहे. आपण ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम चालू केली पाहिजे आणि तिच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.