|

नवी देहली : पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या, ७ मे या दिवशी देशभरातील एकूण २५९ ठिकाणी हा सराव केला जाणार आहे. यात राजधानी देहली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या ४ महत्त्वाच्या शहरांसह चंडीगड, शिमला, कर्णावती, भोपाळ, इंदूर, भाग्यनगर, विशाखापट्टणम्, बेंगळुरू आदी मोठ्या शहरांचाही समावेश आहे. शत्रूराष्ट्राने आक्रमण केल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी हा सराव असणार आहे. वर्ष १९७१ नंतर प्रथमच देशात असे आपत्कालीन सराव करण्यात येणार आहे.
🚨 Nationwide Civil Defence Mock Drill on May 7! 🛡️
India gears up for its biggest emergency drill since the 1971 war — covering 259 districts.
After the #PahalgamTerrorAttack & rising tensions, the Centre stresses preparedness for terror strikes, disasters & crises.… pic.twitter.com/S8MAhhAPGc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2025
१. आक्रमणाची चेतावणी देणार्या भोंग्यांची चाचणी, तसेच स्वत:चे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
२. ‘क्रॅश ब्लॅकआऊट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’ (इतरांना आपण किंवा आपली शस्त्रास्त्रे दिसू नयेत; म्हणून सैनिक वापरतात ते साहित्य किंवा ते रंग), तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची सिद्धता आणि सराव आदींचा समावेश केला जाईल, अशी माहिती मंत्रालयातून दिली गेल्याचे समजते.
३. पहिल्या श्रेणीत संवेदनशील अशी १३ शहरे आहेत. दुसर्या श्रेणीत २०१ आणि तिसर्या श्रेणीत ४५ शहरे आहेत.
४. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत येतात. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे, तर उरण येथे माल वाहतूक करणारे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर आहे. तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तीनही ठिकणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असण्याची शक्यता आहे.
५. गृहखात्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, १९६८ यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित असा सराव आहे.
६. सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड, एन्.सी.सी. कॅडेट, एन्.एस्.एस्. स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना या सरावासाठी सामावून घेतले जाऊ शकते.
७. सरावाच्या वेळी वीज खंडित होणे, ब्लॅकआऊट, मोठ्या आवाजातील ‘सायरन’ ऐकू येऊ शकतात. काही ठिकाणी सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी केली जाऊ शकते. काही शहरांमध्ये वाहतूक वळवली जाऊ शकते.
महाराष्ट्रातील ठिकाणे
महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सराव करण्यात येणार आहे.
गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये सराव केला जाणार आहे.