पाकिस्तानी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन यांसाठी प्रयत्नरत असलेले डॉ. ओमेंद्र रत्नू !

पाकिस्तानमध्ये तेथील हिंदूंवरील अत्याचारांच्या अनेक बातम्या प्रतिदिन आपण वाचतो आणि त्याविषयी दु:ख व्यक्त करून सोडून देतो. अशा परिस्थितीत भारतातीलच एक हिंदुत्वनिष्ठ डॉ. ओमेंद्र रत्नू हे तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी धडपडत आहेत. पाकिस्तानी हिंदूंच्या रक्षणासाठी वर्ष २०१२ पासून कार्यरत असलेले आणि ‘निमित्तेकम्’ या संस्थेचे प्रमुख डॉ. ओमेंद्र रत्नू यांच्याशी केलेल्या वार्तालापातील सूत्रे येथे पाहूया. डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी पाकमधील अत्याचारग्रस्त हिंदूंना भारतात सुरक्षितरित्या आणण्याचे मोठे आणि कठीण काम हे साधना अन् व्रत म्हणून स्वीकारले आहे.

डॉ. ओमेंद्र रत्नू

१. ‘निमित्तेकम्’ संस्था

‘निमित्तेकम्’ संस्थेतील ‘निमित्तेकम्’चा अर्थ ‘निमित्तमात्र असणे’, असा आहे. त्याचा अर्थ ‘आम्ही भगवान श्रीकृष्णाचे निमित्तमात्र आहोत’, त्यामुळे कुणाला कुठला अहंकार होत नाही. आम्ही ही सेवाच करत आहोत. हा पुष्कळ गंभीर आणि पीडादायक विषय आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे जो हिंदूंचा नरसंहार चालू आहे, वर्ष २०१९ मध्ये ‘युरोपियन युनियन’च्या संसदेचा अहवाल आला, त्यामध्ये ‘प्रतिदिन ३ हिंदु – शीख मुली त्यांच्या घरातून पळवून नेल्या जातात’, असे नमूद केले आहे.

२. आतापर्यंत १४ सहस्र हिंदूंना भारतात आणले !

पाकमध्ये अशी परिस्थिती आहे, तरी भारतातील हिंदूंचे प्राधान्य क्रिकेट, बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी), स्वत:च्या मुलांच्या विवाहावर कोट्यवधी रुपये खर्च करणे आहे. भारतात कुमारिका पूजन करणारे पाकमध्ये हिंदु मुलींच्या दु:स्थितीविषयी काही करत नाहीत. या मुलींचा तळतळाट हिंदु समाजाला लागत आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न असे आहेत की, ज्या हिंदूला भारतात यायचे आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांची कागदपत्रे सिद्ध करणे, त्यांच्यासाठी प्रायोजक शोधणे, ‘गॅझेटेट’ (राजपत्रित) अधिकार्‍याद्वारे त्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळवणे; पोलीस, गुप्तचर अधिकारी यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतर त्यांना इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात पाठवणे, जेथे व्यक्तीला व्हिसा मिळतो आणि नंतर अटारी सीमा ओलांडून सन्मानाने भारतात प्रवेश दिला जातो. मागील १० वर्षांत आम्ही १४ सहस्र पाकिस्तानी हिंदूंना भारतात प्रवेश मिळवून दिला आहे. अद्यापही ३ कोटी हिंदू पाकमध्ये आहेत,  जे पशूप्रमाणे जीवन जगत आहेत, दु:खी आहेत.

३. हिंदूंना गुलामाची वागणूक

तेथील हिंदूंशी बोलल्यावर लक्षात येईल की, आता २१ वे शतक चालू आहे, तरीही तेथील मोठे जहागीरदार जे स्वत: मुसलमान आहेत, ते हिंदूंना गुलामाप्रमाणे ठेवतात. त्यांना लाकडी पिंजर्‍यांमध्ये ठेवण्यात येते. त्यात त्यांना रात्री बंद केले जाते आणि सकाळी मोकळे केले जाते. ज्या कुणा हिंदूकडे सुंदर मुलगी असेल, तर तिला पळवून नेले जाते. जहागीरदार तिच्यावर अनेक वर्षे अत्याचार करतात आिण जेव्हा ती एकदम निरुपयोगी होऊन जाते, तेव्हा तिची हत्या केली जाते.

४. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए ) प्रभावी करण्याची आवश्यकता !

‘सीएए’ केल्याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानतो. हा कायदा वर्ष २०२४ मध्ये येता येता, तो तेवढा प्रभावी राहिला नाही. वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी हा विषय त्यांच्या निवडणुकीच्या घोषणापत्रात घेतला होता, त्यातून या विषयाची बिजे रोवली गेली होती. मी पंतप्रधान मोदी यांना विनंती करतो की, ‘त्यांनी पाकमधील हिंदूंकडे लक्ष द्यावे’, अन्यथा आपण त्यांना पुढील १० ते १५ वर्षांत गमावू आणि एक अशा प्रकारची हानी होईल, जी हिंदु समाज कधीही दुरुस्त करू शकणार नाही. मी एक पुस्तक लिहित आहे. त्यामध्ये मी असा निष्कर्ष नोंदवला आहे की, जर आपण पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना वाचवू शकलो नाही, तर आपण भारतातीलही हिंदूंना वाचवू शकणार नाही.

५. पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात आणण्याची प्रक्रिया

जेव्हा एखाद्या हिंदूला पाकमधून बाहेर काढायचे असते, तेव्हा एक भारतीय प्रायोजक शोधावा लागतो. आता येथे प्रश्न रहातोच की, पाकच्या नागरिकाला कोण भारतीय नागरिक प्रायोजक होणार ? हे प्रायोजक सध्या ते लोक असतात की, जे पाकमधील नागरिक यापूर्वीच भारतात आले आहेत, त्यांना विनंती करून प्रायोजक बनवतो.

नागरिकत्वाच्या व्हिसासाठी अर्जावर समजा राजस्थान येथील गॅझेटेड अधिकार्‍याची स्वाक्षरी घ्यायची आहे, तर कोण स्वत:ची नोकरी धोक्यात घालून पाकच्या हिंदूला भारतात आणण्यासाठी स्वाक्षरी करील ? माझ्या वैयक्तिक ओळखीमुळे काही डॉक्टर मंडळी, काही कट्टर हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने गॅझेटेड अधिकार्‍याची स्वाक्षरी मिळवतो. पूर्वी ही कागदपत्रे ऑनलाईन जायची. आता नव्या कायद्यामुळे ती प्रत्यक्ष पाठवावी लागतात. भारतातून प्रत्यक्षात पाकमध्ये टपाल जात नाही, तर नागरिकत्वाची कागदपत्रे कशी जातील ? त्यामुळे आम्हाला ही कागदपत्रे प्रथम दुबई येथे पाठवावी लागतात. तेथून पाकिस्तानला पाठवावी लागतात. आधी हे विनामूल्य पाठवता यायचे, आता प्रत्येक अर्जामागे आम्हाला ५०० रुपये खर्च येतो. यामध्ये समजा अर्ज तेथे गॅझेटेड अधिकार्‍याची स्वाक्षरी करून पोचला, प्रायोजक मिळाला, पोलिसांद्वारे पडताळणी झाली, असे सर्व होऊनही पाक येथील भारतीय दूतावास व्हिसा देत नाही. यामध्ये आणखी एक चीड आणणारी गोष्ट होते. दूतावासातील अधिकार्‍यांकडे व्हिसासाठी अर्ज करणार्‍यांना निम्म्यांना व्हिसा द्यायचे, तर उर्वरितांना द्यायचे नाहीत. माझ्याकडे जोधपूर येथे पुनर्वसन केंद्रावर १ डझन अशा माता आहेत, ज्यांची मुले अद्याप पाकमध्ये आहेत. त्या मला नेहमी संपर्क करून रडतात, तर त्यांना मी काय उत्तर देऊ ? अशी निष्ठूर व्यवस्था आहे. या व्यवस्थेविरुद्धही लढावे लागत आहे.

ज्या हिंदूंना तेथून बाहेर काढणे शक्य आहे, ते करणे ही माझी साधना आहे. आव्हाने पुष्कळ आहेत, याखेरीज तांत्रिक गोष्टी पुष्कळ आहेत. तो एक मोठा विषय आहे. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक घोषणापत्रात पाक येथील हिंदूंना भारतात नागरिकत्व देण्याविषयीचा विषय होता, त्यामुळे आम्ही काम करू शकतो. नाही तर पाकमधील हिंदूंच्या समवेत काम करणारे माझ्यासारखे लोक ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’खाली कारागृहात गेलो असतो.

६. हिंदु समाजाच्या पैशांवरच पुनर्वसन !

हा एक चमत्कारच आहे की, पाकमधील हिंदू एवढे अत्याचार होऊनही हिंदु म्हणून जिवंत आहेत; मात्र त्यांना कोणतेही संरक्षण नसल्यामुळे आता मात्र गावेच्या गावे मुसलमान बनत आहेत. तेथून संपर्क येतात. त्यांना कुणीच विचारणारे नाही. त्यामुळे त्यांचा सध्या नाईलाज आहे. या हिंदूंना भारतात आणून वसवण्यासाठी सरकार कोणतेही पैसे देत नाही. आम्हाला हिंदु समाज जे पैसे देत आहे, त्यावर त्यांचे पुनर्वसन चालू आहे.

७. हिंदूंमधील विविध समाजघटकांनी पाकच्या हिंदूंचे दायित्व स्वीकारणे

हिंदु समाजातील घटकांकडून मला एवढे पैसे मिळत नाहीत की, सहस्रो लोकांना प्रतिदिन जेवण देऊ शकेन. पाक हिंदूंमधून भारतात येणारे बहुसंख्य लोक दलित, भील, मेघवाल, कोली आणि राजपूत समाजातील आहे. देवाच्या कृपेने हे समाज भारतात सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही भारतात आणलेल्या हिंदूंना त्यांच्या समाजाकडे सुपुर्द करतो, म्हणजे भील व्यक्तीला भील समाजाकडे, मेघवाल व्यक्तीला मेघवाल समाजाकडे, राजपुताला राजपूत समाजाकडे. नंतर संबंधित समाजच त्यांचे भरणपोषण करतो. त्यांना अनाथ सोडत नाही. यामुळे काही वेळा मी जातीव्यवस्थेचे समर्थनही करतो. संबंधित जातीच्या हिंदूंचे संबंधित जातीकडून तरी काळजी घेतली जाते. केवळ हिंदु म्हणून त्याला साहाय्य मिळत नाही, तर किमान जातीबांधव म्हणून तरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते, हे महत्त्वाचे आहे. किमान हिंदूंचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. काही भील जातीच्या लोकांना जोधपूर येथे वसवण्यात आले होते, तेव्हा तेथील तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांच्या दुकानांवर बुलडोझर चालवला होता.

मी संबंधित समाजांकडे आवाहन केले. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पैशांतून भूमी खरेदी केली. जोधपूर येथील झावर गावात भूमी खरेदी केली. आता त्यावर एका भवनाची निर्मिती होण्यासाठी पुन्हा निधी आवश्यक आहे. भवन, मंदिर, एक सभागृह असे सर्व त्यात असेल. ‘निमित्तेकम् ग्राम संस्थे’द्वारेच तेथे गाव वसवत आहोत. या वर्षात ते काम पूर्ण होईल.

८. नागरिकत्व सुधारणा कायद्याची व्याप्ती वाढवावी !

‘सीएए’ कायद्यात समयमर्यादा दिली आहे ३१ डिसेंबर २०१४ ! मात्र यानंतर पाक येथील हिंदूंवर अत्याचार झाले नाहीत का ? सध्याच्या कायद्याचा लाभ ३० ते ४० सहस्र हिंदूंना होणार, ज्यांचे नागरिकत्व अडकले आहे. अन्य हिंदूंचे काय ? हा प्रश्नच आहे. भारतात आलेल्या लोकांना जोधपूरच्या व्यतिरिक्त जयपूर, जैसलमेर, बाडमेर या ठिकाणी पुनर्वसन केले जाते. काही लोक गुजरातला जातात. छत्तीसगड येथील रायपूरमध्ये शरणार्थी दरबार आहे पू. डॉ. युधिष्ठिर महाराज यांचा. ते पाकच्या हिंदूंना निवारा देतात. काही लोक हरिद्वार, तर काही देहलीला जातात. ज्या ठिकाणी ज्यांना जायचे तेथे लोक जातात.

९. पाकिस्तानी हिंदूंविषयी हिंदु समाजाने आपुलकी वाढवणे महत्त्वाचे !

पाकमधील हिंदूंविषयी भारतातील हिंदु समाज ज्यामध्ये हिंदु साधू-संत, संघटना यांना विशेष आपुलकी वाटली पाहिजे, ती सध्या नाही. त्या हिंदूंची स्थिती पुष्कळ वाईट आहे. लहान मुलींवर बलात्कार होतात, त्या मुलींना मानसिक धक्का बसतो, हिंदूंना मारले जाते, अशांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. बांगलादेशातील परिस्थितीही हिंदूंना कठीण होत चालली आहे. तरी पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या स्थितीत मोठा भेद, म्हणजे बांगलादेशातील हिंदू हे उच्चशिक्षित आहेत, श्रीमंत आहेत. व्यावसायिक, अभियंते, आधुनिक वैद्य असे लोक तेथे पुष्कळ आहेत, याउलट पाकमधील हिंदूंमध्ये अल्पशिक्षित, खालच्या वर्गातील हिंदू पुष्कळ आहेत. पाकमधील हिंदूंना त्यांची हिंदु नावे लपवून, मुसलमान नावे धारण करून रहावे लागते, नाही तर कधी त्यांची हत्या होईल, हे सांगता येत नाही. ‘पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंना काही झाले, तर भारत त्यांना आश्रय देईल, काळजी घेईल’, असा संदेश त्यांना दिला पाहिजे.

पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंना वाचवले पाहिजे. त्या हिंदूंचे रक्षण झाले, तरच भविष्यात भारतातील हिंदू सुरक्षित रहातील.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१.५.२०२५)

पाकमधून येणार्‍या हिंदूंच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र बोर्ड नेमावा !

माझे सरकार, हिंदूंचे नेते यांना निवेदन आहे की, पाकिस्तानातील ३ कोटी हिंदूंसाठी एक वेगळे बोर्ड असावे. नेदरलँडची लोकसंख्या दीड कोटी आहे, म्हणजे नेदरलँडच्या लोकसंख्येच्या दुप्पट पाकच्या हिंदूंची संख्या आहे. या सर्व हिंदूंचे येथे पुनर्वसन करणे, हे एका संस्थेद्वारे शक्य तर होणारच नाही. यासाठी एका बोर्डाची रचना होणे आवश्यक आहे. शासनात एक विभागच असावा, ज्याकडे किमान ५ सहस्र कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असेल. त्यांनी भूमीचे वाटप करावे. राजस्थानमध्ये सहस्रो वर्ग किमी भूमी रिकामी आहे. जागेची कमी नाही, त्यांना भूमीचे प्लॉट पाडून तेथे वसवण्यात आले, त्यांची एक वसाहत असली, तर बरे होईल. अन्यथा कधी पाणी नाही, कधी वीज नाही, असे धक्के सध्या खातात, तसे खावे लागतील.

– डॉ. ओमेंद्र रत्नू

संपादकीय भूमिका

पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंना वाचवले, तरच भविष्यात भारतातील हिंदू सुरक्षित रहातील, हे लक्षात घ्या !