७० देशांतील राजदूतांची पहलगाम आतंकवादी आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली !

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ७० देशांचे मुंबईतील वाणिज्य दूत

मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ७० देशांचे मुंबईतील वाणिज्य दूतांनी पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. २९ एप्रिल या दिवशी राजभवन येथे विविध देशांच्या राजदूतांचा स्वागत सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्या वेळी ही श्रद्धांजली वहाण्यात आली.

राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने राजशिष्टाचार विभागाच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांसह सर्व वाणिज्य दूतांनी एक मिनिट स्तब्ध उभे राहून आतंकवादी आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी सर्व वाणिज्यदूतांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह विविध विभागांचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.