प्रशासकीय गुणवत्तेमध्ये सातारा पोलिसांचा दुसरा क्रमांक !

सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यशासनाच्या १०० दिवसांच्या अंतरिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमध्ये १०० दिवसांचा अंतरिक मूल्यमापन कार्यक्रम जाहीर केला होता. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण कार्यक्षमता, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक गोष्टी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग इत्यादी निकषांवर आंतरिक मूल्यमापन केले.

राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, साहाय्यक आयुक्त, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार होते.

सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी सातारा पोलिसांच्या यशाचे अभिनंदन केले आहे. अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये सातारा पोलिसांनी, प्रशासकीय गुणवत्ता, संकेतस्थळे, सेवा विषयक गोष्टी आणि कर्मचारी प्रशिक्षण या ४ सूत्रांवर बाजी मारली आहे. गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस दलाचे विशेष अभिनंदन केले आहे. १६ एप्रिल २०२५ या दिवशी १०० दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होणार आहे. यापुढेही लोककल्याणाकरीता सातारा पोलीस मुख्यालयाचे काम अशाच पद्धतीने चालू राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.