४७ कोटी रुपयांचा घोटाळा

दिग्रस (यवतमाळ), १५ जानेवारी (वार्ता.) – येथील ४७ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार प्रणित देवानंद मोरे, अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे आणि जयश्री देवानंद मोरे यांना लोणावळा येथून अटक करण्यात आली. दिग्रस पोलिसांनी ३६ दिवसांच्या सखोल अन्वेषणानंतर आरोपींना पकडले.
वर्ष २०२० मध्ये स्थापन झालेल्या ‘जन संघर्ष निधी लि.’च्या ७ शाखांमधून नागरिकांचे पैसे गुंतवून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. तो उघड झाल्यानंतर स्थानिक साहिल जयस्वाल, अनिल आणि पुष्पा जयस्वाल यांना आधीच अटक करण्यात आली होती. अपहार केलेल्या रक्कमेतून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी आणि विक्री केल्याचे ‘एस्.आय.टी.’च्या अन्वेषणातून उघडकीस आले. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिका :अल्प कालावधीत भरघोस लाभ मिळवण्याच्या लालसेतून ग्राहकांना हेरणारे घोटाळेबाज आणि अशा घोटाळेबाजांवर होणारी थातुर-मातुर कारवाई यांमुळे सांघिक आर्थिक गुन्हेगारी वाढत आहे, हे दुर्दैवी आहे ! |