पुष्कळ झाल्या श्रद्धा, साक्षी ।
आता तूच उठली पाहिजे ।।
कुणी नाही येणार तारायला ।
आता तूच लढली पाहिजे ।।
स्त्री ही कधीच अबला नाही ।
हा आत्मविश्वास जगला पाहिजे ।।
सळसळू दे रक्त अन् डोळ्यांत आग ।
तुझ्यात विरांगना आली पाहिजे ।।
अन्याय होता समोर तुझ्या ।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे ।। १ ।।
हो तू उठ त्वेषाने अन् कस कंबर ।
नराधमांना दाखव जरब ।।
न्यायासाठी खोच पदर ।
तरच मिळेल नारीला आदर ।।
वंशाच्या दिव्याच्या नादात ।
नाहक विझल्या पणती ।।
त्या पणतीची आता ।
मशाल झाली पाहिजे ।।
अन्याय होता समोर तुझ्या ।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे ।। २ ।।
तू सोड तुझा अबलापणा ।
या झुगारून सार्या रिती ।।
आसुसलेल्या वासनांधांवर ।
वापरावी दंड-भेदाची नीती ।।
या देशाचे भविष्य तुझ्यातच ।
त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे ।।
मान्य आहे शिवराय जन्मावे घराघरांत ।
सोबत झाशीची राणी अवतरली पाहिजे ।।
अन्याय होता समोर तुझ्या ।
अंगात रणरागिणी संचारली पाहिजे ।। ३ ।।
– कु. संध्या कुरापाटी (वय १९ वर्षे), कुमठा नाका, सोलापूर. (२१.१०.२०२४)