कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवा !

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन

कोल्हापूर – तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतूक पोलीस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी इतकी असते की, सरळ मुख्य राज्य महामार्गावर, तसेच शहर विभागातील मुख्य कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीमुळे उंचगावच्या शेतकर्‍यांनाही निगडेवाडी पंचगंगा नदी परिसरातील असणार्‍या आपल्या शेतामध्ये जाताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता दसरा आणि दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात पर्यटकांची येण्याची संख्या मोठी असल्याने होलसेल आणि रिटेल बाजारपेठ असल्याने येथेही खरेदीसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणार्‍यांची संख्या मोठी आहे. तरी तावडे हॉटेल चौकामध्ये शहर वाहतूक शाखेच्या २ – ३ पोलिसांची नेमणूक करावी आणि सततच्या वाहतूक कोंडीचे योग्य नियोजन करावे. हे न केल्यास करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता बंद आंदोलन करणार आहे, याची शहर वाहतूक शाखेने नोंद घ्यावी. याविषयीचे निवेदन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब यांना देण्यात आले. या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, दिपक रेडेकर, शरद माळी उपस्थित होते.