वक्फ बोर्डाच्या कायद्यातील सुधारणेविषयी विरोधकांनी अपप्रचार बंद करावा ! – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री

पुणे – वक्फ बोर्डाच्या जागांचा अवैध आणि अपवापर बंद व्हावा, तसेच या जागा मुसलमानांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे. असे असतांना विरोधकांकडून मात्र सरकार मुसलमानांच्या भूमी काढून घेणार असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. हा अपप्रचार तातडीने थांबवावा. कुणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून दिशाभूल करू नये, असे आवाहन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. ते ‘मॉडर्न महाविद्यालया’तील ‘युवा कनेक्ट’ या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वरील उद्दिष्टांसाठी वक्फ कायद्यामध्ये पालट करण्यास अनेक मुसलमान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर सव्वा कोटींहून अधिक नागरिकांनी हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत. हाही जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. आलेल्या सर्व हरकती आणि सूचना यांचा विचार केला जाईल.