सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah

गृहमंत्री अमित शहा यांचे अधिकार्‍यांना निर्देश

गृहमंत्री अमित शहा

 नवी दिल्ली – सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. लोकसंख्याशास्त्रीय पालटांच्या सूत्रावर झोलेल्या महत्त्वाच्या बैठकीत ते बोलत होते. यासह परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सीमावर्ती भाग, मेट्रो शहरे आणि औद्योगिक शहरे यांना भेटी देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यापूर्वी ५ जून या दिवशी  शहा यांनी ‘बंगाल, त्रिपुरा आणि बिहार या राज्यांतील लोकसंख्याशास्त्रीय पालट खपवून घेतले जाणार नाही’, असे स्पष्ट केले होते. देशाच्या सीमांच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘प्रगत सीमा सुरक्षा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात !

आंतरराष्ट्रीय सीमांवरील देखरेख आणि सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत शहा यांनी सीमा व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला. त्रिपुरातील लंकामुरा सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांशी संवाद साधतांना त्यांनी ‘स्मार्ट बॉर्डर’ (प्रगत सीमा सुरक्षा) प्रकल्प अंतिम टप्प्यात पोचल्याची माहिती दिली. हा प्रकल्प देशातील ७ ते ८ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक प्रशासन आणि सीमावर्ती सुरक्षा दलांचा समन्वित सहभाग असेल. सीमासुरक्षा अधिक प्रभावी करण्यासह लोकसंख्याशास्त्रीय पालटांवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.