गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi

पंतप्रधान मोदी यांचे विधान

नवी देहली – गेल्या १२ वर्षांत भारतातील आरोग्य सेवा अधिक चांगली, लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. एक निरोगी भारत घडवण्यासाठी सरकार हे प्रयत्न चालूच ठेवेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’द्वारे केले. ते पुढे म्हणाले की, जगातील सर्वांत मोठा आरोग्य कार्यक्रम ‘आयुष्मान भारत’ राबवणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. याचा मला अभिमान वाटतो. ही योजना समाजातील सर्वांत गरीब आणि दुर्बल घटक यांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरवते.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत देशाने सामान्य जनतेपर्यंत दर्जेदार वैद्यकीय उपचार पोचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजने’चा उल्लेख करतांना त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे औषधे, ‘स्टेंट्स’ (हृदयविकाराच्या उपचारात रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी वापरली जाणारी बारीक धातूची नळी) आणि गुडघ्याचे ‘इम्प्लांट्स’ (गुडघ्याच्या शस्त्रक्रियेत वापरली जाणारी धातूची वाटी किंवा सांधा) लक्षणीयरीत्या स्वस्त झाले आहेत. यामुळे लाखो लोकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

आरोग्यसेवा सुलभ करणे, ही कोणत्याही राष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक !

केंद्र सरकारच्या नागरिक सहभाग मंचाने (‘मायगोव्ह इंडिया’ने) म्हटले की, आरोग्यसेवा सुलभ करणे, ही कोणत्याही राष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या १२ वर्षांत या दिशेने मोठी प्रगती केली. आज देशाची आरोग्यसेवा पायाभूत सुविधा पूर्वीपेक्षा अधिक सशक्त आहे.