आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच

देहूगाव (जिल्हा पुणे) – आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना श्रीक्षेत्र देहू येथील पवित्र इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृतावस्थेत तरंगतांना आढळले. नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला असून हे मृत मासे घाटावर वाहून आल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. वारीसाठी देहूत लाखो वारकरी येत असून ते याच नदीत स्नान आणि आचमन करतात. अशा पवित्र काळात नदीची झालेली ही दूरवस्था भाविकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. यामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीने नदीपात्रात उतरून मृत मासे बाहेर काढून परिसराची स्वच्छता केली. (हे कार्य ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांना करावे लागत असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवाच कशाला ? – संपादक)

संपादकीय भूमिका

पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आषाढी वारीच्या तोंडावर नदीची अशी दूरवस्था होणे, हे प्रशासकीय उदासीनतेचे लक्षण आहे ! या प्रदूषणास कारणीभूत असणार्‍या संबंधितांवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे !