कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटील यांचा मोठा वाटा ! – गृहमंत्री

नागपूर – पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहेत, हे विसरू नका. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. नागपूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, काळाच्या ओघात व्यवस्था पालटली. लोकशाहीत अनेक संस्था निर्माण झाल्या. व्यवस्था उभी राहिली. मानाच्या पदाला सन्मान मिळणे आवश्यक आहे. मानाच्या पदाला आम्ही १५ सहस्र रुपये मानधन केले. ४ महिन्यांचे पैसे खात्यात जातील आणि दर महिन्याला योग्य प्रकारे तुमच्या खात्यात येतील. आपल्या सरकारमध्ये फाईल गोगलगायीच्या गतीने चालते. असे झाले की, आम्हाला धक्का द्यावा लागतो. गरीबाला त्रास झाला, तर त्रास देणार्‍याला शासन झाले पाहिजे. हे काम पोलीस पाटील यांच्यामुळे होते.’’ (सरकारमध्ये गोगलगायीप्रमाणे काम चालते हे सांगणारे नको, तर तसे होऊच नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढणारे शासन हवे ! – संपादक)