Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाच्‍या नावाखाली हिंदूंवर आक्रमण !

  • अनेक हिंदूंची घरे जाळली !

  • ‘ज्‍यांच्‍या मामाचे घर भारत आहे त्‍यांनी त्‍वरीत बांगलादेश सोडावा’ अशा दिल्‍या जात आहेत धमक्‍या !

बांगलादेशमधील हिंसाचार

नवी देहली – बांगलादेशमध्‍ये आरक्षणावरून गेले काही दिवस हिंसाचार झाला. आता सर्वोच्‍च न्‍यायालयाने आरक्षणाची मर्यादा ७ टक्‍क्‍यांवर आणल्‍याने आंदोलनकर्त्‍यांचा विजय झाला आहे. या हिंसाचाराच्‍या वेळेचा एक व्‍हिडिओ ‘एक्‍स’वर प्रसारित करण्‍यात आला आहे. यात या हिंसाचाराच्‍या माध्‍यमातून हिंदूंची घरे जाळण्‍यात आल्‍याचे यात दिसून येत आहे. जितेंद्र प्रताप सिंह नावाच्‍या व्‍यक्‍तीने हा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे.

१. जितेंद्र सिंह यांनी या पोस्‍टमध्‍ये लिहिले आहे की, आंदोलक ध्‍वनीक्षेपकावरून बोलत आहेत, ‘भारत जाडर मामर बारी, बांगला छरो तारी’ म्‍हणजेच ज्‍यांच्‍या मामाचे घर भारत आहे त्‍यांनी लवकर बांगलादेश सोडावे.’

२. बांगलादेशात या हिंसाचाराच्‍या आडून अनेक हिंदूंची घरे जाळली जात आहेत, त्‍यांच्‍यावर आक्रमणे होत आहेत आणि संपूर्ण बांगलादेशात भारतविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे.

३. बांगलादेशातील हिंसाचारामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. या हिंसाचारामध्‍ये आतापर्यंत ११५ हून अधिक लोक मारले गेले आहेत. भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील भारतीय उच्‍चायुक्‍त भारतीय नागरिकांच्‍या सुरक्षेसाठी स्‍थानिक अधिकार्‍यांच्‍या सतत संपर्कात आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात एरव्‍हीही हिंदूंवर आक्रमणे केली जातात. त्‍यामुळे अशा हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य करण्‍यात येणे आश्‍चर्यकारक म्‍हणता येणार नाही !
  • बांगलादेशाच्‍या पंतप्रधान शेख हसीना हिंदूंच्‍या रक्षणासाठी आधीही काही करत नव्‍हत्‍या आणि आताही त्‍यांनी काही केलेले नाही. पुढेही त्‍या काही करतील, अशी शक्‍यता नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे !