वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील महादेव मंदिराशेजारील जागा ‘वक्फ बोर्डा’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंद !

वडणगे ग्रामपंचायतीने एकदाही स्वतःचे म्हणणे न मांडल्याने भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या घशात !

कोल्हापूर – वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे आता ‘वक्फ बोर्डा’ने बळकावले आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या संदर्भात समस्त हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. ‘या जागेच्या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या प्रसंगी ग्रामपंचायतीने स्वतःचे म्हणणे मांडले नाही’, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘या संदर्भात आवश्यक बाजू पडताळून वरिष्ठ स्तरावर अपील करण्याच्या, तसेच या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनास लक्ष घालण्यास सांगू’, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या शिष्टमंडळास दिले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांसमवेत तेथील ग्रामस्थ पिराजी संकपाळ, अमर चौगुले, अशोक देसाई, गणेश जाधव, अनिल जाधव, प्रशांत ठमके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना वडणगे येथील ग्रामस्थ पिराजी संकपाळ म्हणाले, ‘‘वडणगे येथील ‘शेती सर्व्हे क्रमांक ८९’ ही भूमी ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. त्या संदर्भात ‘ही भूमी आमची आहे’, असा दावा ‘वक्फ बोर्डा’ने केला होता. गेल्या २५ वर्षांपासून हा दावा चालू आहे. या दाव्यात ग्रामपंचायत प्रशासन स्वत:ची बाजू सक्षमपणे मांडत नसल्याने ही भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नावावर झाली आहे. याच्या निषेधार्थ गावातील सर्व हिंदूंनी बंद पाळला. ग्रामपंचायत प्रशासन योग्य भूमिका घेत नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावलेली आहे.’’ (याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘वडणगे ग्रामपंचायतीतील उत्तरदायी व्यक्ती आणि ‘वक्फ बोर्ड’ यांचे काही साटेलोटे आहे का ? याची चौकशी करावी’, अशी मागणी कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?
  •  ‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !