सिंधुदुर्ग : तोंडवळी-तळाशिल येथील वाळूच्या अवैध उपशाच्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

पूर्वसूचना न देता पुन्हा आंदोलन करण्याची ग्रामस्थांची चेतावणी !

तोंडवळी-तळाशिल येथे अवैधरित्या केला जाणारा वाळूचा उपसा बंद करा, अशी मागणी करणारे ग्रामस्थ

मालवण : तालुक्यातील तोंडवळी-तळाशिल येथे अवैधरित्या केला जाणारा वाळूचा उपसा बंद करा, अशी मागणी करत संतप्त महिला आणि ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना खडसावले. हे प्रकार न थांबल्यास यापूर्वी स्थगित केलेले आंदोलन पूर्वसूचना न देता पुन्हा चालू केले जाईल, अशी चेतावणी या वेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली. (या भागात होणार्‍या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात ग्रामस्थ सातत्याने निवेदन देणे, आंदोलन करणे यांद्वारे आवाज उठवतात, तरीही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही ? – संपादक)

येथे चालू असलेला वाळूचा अवैध उपसा, परप्रांतीय कामगारांचा त्रास, तसेच अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी येथील खाडीत उभे राहून केलेले आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांसह बैठक झाली होती. याला १५ दिवस झाले; मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ‘स्थगित केलेले आंदोलन पुन्हा चालू करू’, अशी चेतावणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिली. (बैठक झाल्यानंतरही संबंधित विषयी प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने जनतेला आक्रमक भूमिका घ्यावी लागते. याला उत्तरदायी कोण ? – संपादक)

परप्रांतीय कामगाराने गोमातेवर अत्याचार केल्याचा आरोप !

‘वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी काम करणार्‍या एका परप्रांतीय कामगाराने गोमातेवर अत्याचार केला असून हे प्रकरण दडपण्यात आले आहे’, असा आरोप करत येथील महिला आणि मुली यांच्याविषयी असा प्रकार घडला, तर त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर ‘यापुढे कारवाई न झाल्यास मला संपर्क करा’, असे जिल्हाधिकारी तावडे यांनी ग्रामस्थांना सांगितले, तसेच पोलीस अधीक्षक अग्रवाल यांना लक्ष घालण्यास सांगून परप्रांतीय कामगारांवर कारवाईची सूचना केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी १४ मार्च या दिवशी तोंडवळी-तळाशिल येथे ग्रामस्थांची भेट घेतली, तसेच तोंडवळी येथील कालावल खाडी आणि समुद्रकिनारी भागाची पहाणी केली. या वेळी ग्रामस्थ आणि महिला यांनी वाळूचा उपसा आणि या कामासाठी येथे कार्यरत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन कारवाईची मागणी केली.

संपादकीय भूमिका

नागरिकांना पुनःपुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन !