JNU Babri Slogan : देहलीतील जे.एन्.यू. विद्यापिठाच्या भिंतीवर लिहिली ‘बाबरी पुन्हा बांधू’ अशी घोषणा !

देहली – देहलीतील कुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापिठील एका भिंतीवर ‘बाबरी पुन्हा बांधू’, असा मजकूर लिहिल्याचे समोर आले. त्याच्या बाजूला काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘एन्.एस्.यू.आय.’चेही नाव लिहिण्यात आले होते. त्याखाली ६ डिसेंबर हा दिनांक लिहिण्यात आला होता. हे समोर येताच विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ भिंतीवरील मजकूर पुसून टाकण्यासाठी भिंत रंगवली.

१. बाबरीची घोषणा लिहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच भिंतींवरील घोषणा आणि भित्तीचित्रे हटवण्याचा आदेश दिला. विद्यापीठ संकुलात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली असून असे प्रकार वारंवार होत असल्याने याचे अन्वेषण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यासह सर्व विभागांना सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

२. विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, सर्व विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांना ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यासंदर्भात चाचपणी करण्यास सांगण्यात आले आहे. तपासाचा अहवाल एका आठवड्यात सुपुर्द करण्याचे निर्देशही समितीला देण्यात आले आहेत.

आमचा मजकुराशी काहीही संबंध नाही ! – ‘एन्.एस्.यू.आय.’ची सारवासारव

दुसरीकडे ‘एन्.एस्.यू.आय.’चे जे.एन्.यू.तील अध्यक्ष सुधांशू शेखर यांनी सारवासारव करत म्हटले की, या भिंतीवर आमच्या संघटनेचे नाव काळ्या शाईमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते. त्यावर कुणीतीरी लाल शाईचा वापर करून ही वादग्रस्त घोषणा लिहिली आहे. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

  • भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळओक करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा ज्या विद्यापिठात भरणा आहे, तेथे असे घडले, तर नवल काय ?
  • असे कृत्य करणार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हिंदूबहुल भारतामध्ये बाबर इतिहासजमा झाला आहे. त्याच्या समर्थकांची राजकीय कारकीर्दही शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे अशा प्रकारे घोषणा लिहिणे, म्हणजे स्वत:चे हसे करून घेण्यासारखे आहे !