रत्नागिरी जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ : १० महिन्यांमध्ये ८४ गुन्ह्यांची नोंद

रत्नागिरी – जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाचे ८४ गुन्हे नोंद झाले असून यातील ८९ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पीडितांच्या जवळचेच नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या अन्वेषणात पुढे आली आहे. अलीकडच्या काळात या घटना वाढू लागल्याचे दिसत आहे.

मुलांना घरातील जवळच्या नात्यातील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सोपवले जाते; मात्र, ही जवळची वाटणारी माणसेच विश्वासघात करतात आणि निष्पाप बालके त्यांच्या अत्याचाराचे बळी ठरतात. या आरोपींवर ३५४ आणि ३७६ कलमाखाली, तसेच पॉक्सोअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये मे महिन्यामध्ये १०, जूनमध्ये ११ आणि जुलै महिन्यांमध्ये १० असे सर्वांधिक गुन्हे घडले आहेत.

संपादकीय भूमिका

नैतिक मूल्यांची घसरण झालेला समाज !