२०० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण !

सुधारित निकाल घोषित करणार

मुंबई – महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (‘महाज्योती’च्या) वतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या (‘एम्.पी.एस्.सी.’च्या) प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. परीक्षा २०० गुणांची असतांना अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘लवकरच सुधारित निकाल घोषित केला जाईल’, असे ‘महाज्योती’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. १९ सहस्र १७३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. निकालाचे काम एका संस्थेला देण्यात आले होते; मात्र निकालात गोंधळ झाल्याने तो संकेतस्थळावरून काढून टाकला आहे. (जरी संस्थेला काम दिले असले, तरी त्यावर ‘महाज्योती’चे नियंत्रण कसे नाही ? सहस्रो विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप कोण भरून काढणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !