महर्षि वाल्मीकि आणि वाल्मीकि समाज यांचा आदर्श प्रत्येक हिंदूंने आत्मसात करावा !- दिलीप गोखले

राजापूर येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महर्षि वाल्मीकि जयंती कार्यक्रम

राजापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – महर्षि वाल्मीकि यांनी निव्वळ रामायण कथा लिहिली नाही, तर ते आद्य कवी होते. प्रभु श्रीरामचंद्र स्वतःहा चारित्र्य, पराक्रम आणि कर्तृत्वाने उत्तुंग होतेच; परंतु त्यांची जीवनकथा महर्षि वाल्मीकि यांनी तेवढ्याच उंचीच्या प्रतीभेने रामायण या महाकाव्याची रचना करून अमर केली. वाल्याचा वाल्मीकि होऊ शकतो, हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून सिद्ध केले आणि कोणताही माणूस स्वत:च्या कर्तृत्वाने उच्च स्थानावर जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी समाजामध्ये उत्पन्न केला.
हाच धर्मांतरित न होता, हिंदु म्हणूनच जिवंत राहिला आहे. त्यामुळे महर्षि वाल्मीकि आणि वाल्मीकि समाज यांचा आदर्श प्रत्येक हिंदूंने आत्मसात करावा, असे आवाहन प्रमुख वक्ते श्री. दिलीप गोखले यांनी केले.

विश्व हिंदु परिषद सामाजिक समरसता विभाग राजापूर यांच्या वतीने येथील बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर येथे महर्षि वाल्मीकि जयंती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ सर्वश्री प्रदीप भाटकर आणि माधव ठाकूर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर आणि प्रमुख वक्ते श्री. दिलीप गोखले यांच्या हस्ते अनुक्रमे महर्षि वाल्मीकि आणि भारतमाता यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

श्री. दिलीप गोखले पुढे म्हणाले की, आपल्या हिंदु समाजातील महत्त्वाचा असणारा वाल्मीकि समाज मुसलमानी आक्रमकांच्या क्रूरतेला तोंड दिलेला तत्कालीन राजपूत आणि ब्राह्मण वंशीय आहे. ज्यांनी मुसलमान होण्यास नकार दिला. त्यांच्याकडून त्या धर्मांध शासकांनी मैला वहाण्याचे काम अतिशय बळजोरीने शेकडो वर्षे करून घेतले. तरीही या धर्मनिष्ठांनी सनातन हिंदु धर्म सोडला नाही. धर्मांतरित न होता, हा समाज हिंदु म्हणूनच जिवंत राहिला आहे. या आपल्या बांधवांविषयी हिंदु समाजाने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.
कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी श्री. महेश मयेकर म्हणाले, ‘‘हिंदूंनी जात, पंथ, पक्ष, वर्ण, भेद सर्व काही बाजूला ठेवून हिंदू म्हणून संघटित झाले पाहिजे.’’

या कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषद दक्षिण रत्नागिरी जिल्ह सामाजिक समरसता प्रमुख संदेश टिळेकर, राजापूर प्रखंडमंत्री विद्याधर उपाख्य राजू करंबेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, सर्व राजकीय क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सकल हिंदु समाज बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.