(म्हणे) ‘दुर्गादेवी असे काही नसून ती एक काल्पनिक गोष्ट आहे !’ – आमदार फतेह बहादूर सिंह, राष्ट्रीय जनता दल

  • बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांची हिंदुद्वेषी गरळओक !

  • स्वत:ला संबोधले ‘महिषासुराचा वंशज’ !

आमदार फतेह बहादूर सिंह

पाटलीपुत्रा (बिहार) – श्रीदुर्गादेवी असे काही नसून ती एक काल्पनिक गोष्ट आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील देहरी येथील राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार फतेह बहादूर सिंह यांनी केली. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते. दुर्गा सप्तशती बनावट आणि निरुपयोगी कथा आहे, असे सांगत त्यांनी स्वत:ला ‘महिषासुराचा वंशज’ असे संबोधले.

सौजन्य शौर्य न्यूज इंडिया 

फतेह बहादुर पुढे म्हणाले की,

१. महिषासुर एक तेजस्वी राजा होता आणि त्याने ९० टक्के बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधित्व केले होते. (महिषासुरसारख्या दुष्ट आणि अहंकारी राक्षसाच्या तावडीतून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी महिषासुरमर्दनी श्री दुर्गादेवीचा अवतार झाला, हे सर्वश्रुत असतांना महिषासुराला तेजस्वी आणि लोकनेता ठरवून फतेह बहादुर यांनी त्यांचे अज्ञानच प्रकट केले आहे ! – संपादक)

२. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, भगवान शिवाने इतर देवतांसह श्री दुर्गादेवीला आवाहन करून तिची निर्मिती केली. या नात्याने दुर्गादेवी ही शिवाची कन्या झाली. दुसरीकडे या दुर्गादेवीला ‘महागौरी’ या नावानेही संबोधले जाते. महागौरी ही शिवाची पत्नी होती, म्हणजे भगवान शिवाने त्याच्या मुलीशी लग्न केले का ?, असा अशलाघ्यही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. (पुराणातील कथांचा वाटेल तसा अर्थ लावून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍या फतेह बहादुर यांच्या अल्प बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी ! – संपादक)

३. मनुवाद्यांनी ‘श्री दुर्गादेवीने महिषासुराच्या कोट्यवधी सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा संहार केला’ल असे लिहिले आहे. मला अशा मनुवाद्यांना विचारायचे आहे की, जेव्हा मूठभर ब्रिटिशांनी भारताला गुलाम बनवले, तेव्हा दुर्गादेवी काय करत होत्या ? (देवता, अवतार आदींच्या उच्चकोटीच्या कार्याविषयी काडीचेही ज्ञान नसणारेच असा अज्ञानमूलक प्रश्‍न उपस्थित करू शकतात ! – संपादक)

यापूर्वी बिहारमधील राजदचे अन्य एक आमदार तथा शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी वादग्रस्त विधान करतांना रामचरितमानसची तुलना ‘पोटॅशियम सायनाइड’शी केली होती.

संपादकीय भूमिका 

  • श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्‍यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !
  • धर्मश्रद्धांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई न होणे हिंदूंना लज्जास्पद !