सनातन धर्मावर टीका करणार्‍यांच्या विरोधात आम्हाला चीड केव्हा येणार ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे ‘मी सनातन धर्मरक्षक’अभियाना अंतर्गत लांजा येथे व्याख्यान

 सनातन धर्मियांना चिड का येत नाही ?-श्री. रमेश शिंदे

लांजा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – जगात सर्वांत चांगला धर्म कोणता आहे? वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब) अशी इच्छा कोण बाळगतो ? विश्‍वशांतीची प्रार्थना करणारा कोणता धर्म आहे ? सर्वांत प्राचीन धर्म कोणता ? अर्थात् या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ‘सनातन धर्म’ हे होय. जगभरात आजतागायत अनेक मोठमोठी हत्याकांडे झाली आहेत. यात कोट्यवधी निरपराध नागरिकांच्या हत्या झाल्या. ही हत्याकांडे मोगल आक्रमक आणि साम्यवादी यांनी केली. यामध्ये सर्वाधिक हत्या सनातन धर्मियांच्यांच झाल्या आहेत. आजही या देशात करुणानिधी स्वत:च्या मुलाला क्रूरकर्मा स्टॅलीनचे नाव देतात आणि याच स्टॅलीनचा मुलगा उदयनिधी पुढे जाऊन हिंदु धर्मावर विकृत टीका करतो. ‘सनातन धर्म डेंग्यू , मलेरियासारखा आहे आणि तो संपला पाहिजे’, असे वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात सनातन धर्मियांना चिड का येत नाही ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला.

उपस्थित धर्माभिमानी

सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. या निमित्ताने येथील ‘गुरुमाऊली’ सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यानात श्री. शिंदे बोलत होते.

व्याख्यानाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भक्ती महाजन यांनी केले. या कार्यक्रमासाठी येथील ३५० जण उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,

१.  उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत, जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधीची ‘री’ ओढत आहेत. तरीही सनातन धर्मीय गप्प का ? जे.एन्.यू. विद्यापिठात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा दिल्या जातात. महिषासुराची जयंती साजरी केली जाते. श्री दुर्गादेवीला वेश्या म्हणून हिणवले जाते. आम्ही ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणतो, मग त्यांनी केलेल्या कार्याचा आम्हाला या वेळेस विसर का पडतो ?

२. भारतात ‘ रेड कॉरिडॉर’ आणि ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार होत आहेत. साधारणत: भारताच्या पश्‍चिम आणि उत्तरपट्ट्यातील  राज्ये ही ‘ग्रीन कॉरिडॉर’ होत आहेत. तर दक्षिण आणि पूर्व पट्ट्यातील राज्ये ‘ रेड कॉरिडॉर’ होत आहेत. ग्रीन पट्ट्यात मुसलमान आक्रमकांचा प्रभाव वाढत आहे, तर ‘रेड कॉरिडॉर’ मध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रासह १० राज्यांत, ७७ जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनी तिरंगाही फडकत नाही.

३. आजपर्यंत ‘हेट स्पीच’चे ३० गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले आहेत. ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ उघडपणे घेतली; म्हणून त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंद केला जातो. आजपर्यंत पुरोगामी, देशद्रोही, नक्षलवादी यांनी या देशाविरुद्ध अनेक विरोधी विधाने केली आहेत. मग त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चे गुन्हे का नोंद झाले नाहीत ?

४. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर म्हणतात, ‘देव मानणे खोट आहे.’ गोंदियातील अंनिसचा प्रमुख नरेश बनसोडे यांनी ४ पोलिसांच्या हत्या केल्यानंतर ‘त्याला अटक करू नका’, असे दाभोलकर पोलिसांकडे निवेदन करतात. यावरून त्यांची विचारसरणी लक्षात येते. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर सर्वप्रथम गुंड विकास खंडेलवाल, मनीष नागोरी यांना अटक करण्यात आली; मात्र दाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळे त्यांचे अन्वेषण थांबवण्यात आले. दाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळे आजपर्यंत सनातन संस्थेच्या सारंग अकोलकर, डॉ. विरेंद्र तावडे, सचिन अंधुरे यांना नाहक अटक करून या प्रकरणात गोवण्यात आले.
डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १२ वर्षे स्वतःचे अकाउंट  घोषित केले नाही. त्यांना ‘स्विस एड फाऊंडेशन’ या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात निधी येत होता. १२ वर्षांचे रेकॉर्ड त्यांनी ६ मासांत दाखवले, त्यातही अनेक त्रुटी होत्या.

उपस्थित धर्माभिमानी

५. प्रत्येक वेळी सनातन धर्मियांनाच षड्यंत्रात गोवले जाते. त्यांच्यावरच अत्याचार केले जातात. यासाठी आपण सर्वांनी ही षड्यंत्रे ओळखली पाहिजेत आणि त्याचा निषेधही केला पाहिजे.