कॅनडा हे हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय !

खलिस्‍तानची मागणी करणार्‍या आतंकवाद्यांना कॅनडाकडून दिला जाणारा पाठिंबा रोखण्‍यासाठी भारतात हिंदु राष्‍ट्र अपरिहार्य !

एकेकाळी ‘शीख हे हिंदु समाज आणि हिंदु धर्म यांचे संरक्षक आहेत’, असे मानले जात असे. पंजाबी हिंदू नेहमीच त्‍यांच्‍या मोठ्या मुलाला शीख धर्मात वाढवत असत. या दोन्‍ही धर्मांमध्‍ये विवाह होत असत आणि दोन धर्म अन् संस्‍कृती यांचे हे मिश्रण होते. पंजाब (भारत) आणि कॅनडा येथे मोठ्या संख्‍येने शीख आहेत. असे असतांनाही कॅनडा हे हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय कसे झाले ? याविषयीचा ऊहापोह या लेखाद्वारे देत आहोत.

‘भारत आणि कॅनडा येथील हिंदुत्‍व मूलतत्त्ववादाच्‍या विरोधातील एकता’ यासंबंधी निघालेला मोर्चा

१. वर्ष १९८४ च्‍या आधीची आणि नंतरची स्‍थिती !

वर्ष १९७० मध्‍ये पंजाबमध्‍ये खलिस्‍तान ही विघटनवादी चळवळ चालू झाल्‍यानंतर बंडखोर शीख नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा उदय झाला आणि पंजाबमधील सर्व वातावरण पालटले. खलिस्‍तानी गटांकडून भारतीय राजकीय संस्‍था, पंजाब पोलीस आणि राजकीय नेते यांवर आक्रमणे होऊ लागली. या आक्रमणांमध्‍ये सहस्रो नागरिक ठार झाले आणि आणीबाणीची स्‍थिती निर्माण झाली. भिंद्रनवाले यांनी आपल्‍या गटातील लोक आणि अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे घेऊन शिखांचे पंजाबमधील पवित्र स्‍थान ‘सुवर्ण मंदिर’ याचा आश्रय घेतला. या वेळी लष्‍कराने कारवाई करून भिंद्रनवाले याच्‍यासह प्रमुख खलिस्‍तानी नेत्‍यांना ठार मारले. या कारणामुळे हिंसाचाराचे दुसरे सत्र चालू झाले. याचा परिणाम म्‍हणजे भारताच्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची वर्ष १९८४ मध्‍ये त्‍यांच्‍या शीख अंगरक्षकांनी त्‍यांची हत्‍या केली. यानंतर शिखांच्‍या विरोधात हिंसाचार चालू झाला, ज्‍यामध्‍ये इंदिरा गांधी यांचा वारसदार आणि त्‍यांचा मुलगा राजीव गांधी अन् त्‍यांचे राजकीय साथीदार यांची महत्त्वाची भूमिका होती. यामध्‍ये सर्वांत मोठी हानी, म्‍हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेले हिंदू आणि शीख यांच्‍यातील सौहार्दाचे संबंध खलिस्‍तानी चळवळीने काही प्रमाणात न्‍यून झाले; परंतु त्‍यानंतर पुढील काही दशकांमध्‍ये काही भागांतील कायदा-सुव्‍यवस्‍थेची ही स्‍थिती पूर्ववत् झाली.

२. कॅनडा हे आतंकवादी घटकांचे नंदनवन !

कॅनडा हे अनेक संस्‍कृतीची ओळख देणारे आहे; कारण तेथील लोकसंख्‍येमधील एक पंचमांश नागरिक हे विदेशात जन्‍मलेले आहेत. ‘स्‍थलांतरित होणार्‍या लोकांचे स्‍वागत करणे आणि त्‍यांचा समाजात अंतर्भाव करणे’, असे करण्‍यात कॅनडाला अभिमान आहे; परंतु यामुळे आतंकवादी गटांना त्‍यांची दुकाने चालवणे सोपे झाले अन् कॅनडातील समाजाला धोका निर्माण झाला. दुर्दैवाने कॅनडातील अनेक राजकारणी या आतंकवादी गटांना मते मिळवण्‍याचा स्रोत समजत असल्‍याने या गटांना त्‍यांच्‍या दुष्‍ट कारवाया करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत आहेत. त्‍यामुळे कालांतराने कॅनडा हे ‘जगातील आतंकवादी घटकांचे नंदनवन’ म्‍हणून ओळखले जात आहे. यामध्‍ये पाकिस्‍तान आणि भारत येथून पळून आलेल्‍या खलिस्‍तानी गुन्‍हेगारांचा समावेश आहे. ‘ग्‍लोबल न्‍यूज’मधील लेखानुसार कॅनडा एक गुप्‍त उपक्रम राबवत आहे, ज्‍यामध्‍ये युद्धातील गुन्‍हेगार, आतंकवादी आणि सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने धोकादायक लोकांना ‘व्‍हिसा’ दिला जात आहे. वर्ष २०१५ मध्‍ये खलिद साबर अब्‍देल अहमद झा याला कॅनडाने कायमचा रहिवासी दाखला दिला. झा इजिप्‍तमधील बंडखोर गटाचा प्रमुख सदस्‍य असून त्‍याचा वर्ष २०१३ मध्‍ये अध्‍यक्ष महंमद मोरसी यांची सत्ता पालटण्‍यात सहभाग होता. ६ मासांपूर्वी तो कॅनडामध्‍ये आला. झा याच्‍यासाठी कॅनडाच्‍या सुरक्षा अधिकार्‍यांनी स्‍वतःचे धोरण शिथिल केले.

३. कॅनडा हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय कसे झाले ?

वर्ष २०२१ पर्यंत कॅनडामध्‍ये शीख समाजातील जवळजवळ ८ लाख लोक स्‍थायिक झाले. यामुळे कॅनडाच्‍या लोकसंख्‍येत त्‍यांची टक्‍केवारी २.१ इतकी झाली. हे शीख लोक मुख्‍यतः ओंतारिओ, ब्रिटीश कोलंबिया आणि आल्‍बर्टा या भागांत अधिक प्रमाणात आहेत. कॅनडामध्‍ये स्‍थलांतरित होणार्‍यांमध्‍ये शीख समाज हा ‘धार्मिक गट’ या दृष्‍टीने चौथ्‍या क्रमांकावर आहे. खलिस्‍तानी आतंकवादी हा कॅनडातील शीख समाजापैकी एक छोटासा हिस्‍सा असून त्‍याची टक्‍केवारी २ टक्‍क्‍यांहून अल्‍प आहे; परंतु हे गट पुष्‍कळ प्रमाणात लहरी असून त्‍यांना काही विरोध झाल्‍यास ते हिंसाचार करतात. यापूर्वी भारतात झालेल्‍या ‘ऑपरेशन ब्‍लू स्‍टार’नंतर भारतातील कायद्यापासून पळून जाऊन कॅनडामध्‍ये गेलेल्‍या खलिस्‍तानी गुन्‍हेगारांना तेथे चांगले आदरातिथ्‍य करणारे वातावरण मिळाले. त्‍यानंतर अधिक वेळ न घालवता त्‍यांनी त्‍यांचे जाळे सिद्ध करून त्‍यांच्‍यासाठी नवीन असलेल्‍या कॅनडाच्‍या भूमीमध्‍ये आतंकवादी कारवाया चालू केल्‍या. वर्ष १९८५ मध्‍ये खलिस्‍तानवाद्यांनी भारताचे ‘एअर इंडिया विमान १८२’ पाडले आणि त्‍यामध्‍ये ३२९ प्रवासी ठार झाले. खलिस्‍तानवाद्यांनी मिळवलेले हे यश कॅनडाच्‍या इतिहासातील ‘सर्वांत वाईट सामूहिक हत्‍या’ ठरली. दुःखाची गोष्‍ट, म्‍हणजे या गुन्‍ह्यासाठी कारवाई करावी, असे कॅनडा सरकारला वाटले नाही.

कॅनडाचे माजी आरोग्‍यमंत्री आणि खासदार उज्‍ज्‍वल दोसांज यांनी वर्ष १९८० मध्‍ये धैर्याने शीख आतंकवादाच्‍या विरोधात घोषणा केली. त्‍यांच्‍या या घोषणेला धमक्‍या देण्‍यात येऊन शीख आतंकवाद्यांना आव्‍हान देणार्‍यांच्‍या विरोधात भीतीदायक वातावरण निर्माण केले गेले. १८ नोव्‍हेंबर १९९८ मध्‍ये दुसर्‍या एका घटनेत कॅनडास्‍थित शीख पत्रकार तारासिंह हायर याची खलिस्‍तानी आतंकवाद्यांनी क्रौर्यतेने हत्‍या केली. हा पत्रकार ‘इंडो कॅॅनेडियन टाइम्‍स’ या वृत्तपत्राचा प्रकाशक होता आणि तो खलिस्‍तानच्‍या शस्‍त्रास्‍त्र लढ्याविषयी लिहीत होता. ‘एअर इंडिया’चे विमान पाडण्‍यात आल्‍याविषयी त्‍याने टीका केल्‍याने त्‍याची क्रूर हत्‍या करण्‍यात आली. अशाच प्रकारची घटना ब्रिटनच्‍या पंजाबी भाषेतील ‘देस परदेस’ या साप्‍ताहिकाचे संपादक तरसेम सिंह पुरेवाल यांच्‍याविषयी घडली. २१ जानेवारी १९९५ या दिवशी साऊथ हॉलमधील पुरेवाल हे त्‍यांचे कार्यालय बंद करत असतांना त्‍यांची हत्‍या करण्‍यात आली. या घटनेमागे शीख आतंकवाद्यांचा हात असल्‍याचा संशय होता. टेरी मिलेवस्‍की यांनी वर्ष २००७ मध्‍ये ‘कॅनेडियन ब्रॉडकास्‍ट कार्पोरेशन’साठी केलेल्‍या माहितीपटामध्‍ये कॅनडातील शीख समाजापैकी आतंकवादी अल्‍पसंख्‍यांकांविषयीचे सत्‍य उघड केले. राजकीय प्रभाव मिळवण्‍यासाठी जाहीररित्‍या आतंकवादाची घोषणा करून ‘स्‍वतंत्र शीख राज्‍याची मागणी करणे’, हे त्‍यांनी चालू ठेवले.

त्‍याचप्रमाणे कॅनडामधील महिला पत्रकार किम बोलान यांनी शीख आतंकवादाविषयी विपुल लिखाण केले आहे. वर्ष १९८५ मध्‍ये ‘एअर इंडिया’च्‍या विमानावरील बाँब आक्रमणाविषयी लिहिल्‍यानंतर तिला ठार करण्‍याच्‍या धमक्‍या देण्‍यात आल्‍या. कॅनडामध्‍ये कायदा आणि सुव्‍यवस्‍थेची अशी स्‍थिती असतांना तेथे राज्‍य करणार्‍या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नेते आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो हे वेगळ्‍याच पद्धतीने वागत आहेत. भारताच्‍या तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या हत्‍येचा दिवस सार्वजनिकरित्‍या मिरवणूक काढून साजरा करणे आणि याला कॅनडाच्‍या अधिकार्‍यांनी कोणताही आक्षेप न घेणे, यावरून ते शीख आतंकवाद्यांना अप्रत्‍यक्षपणे पाठिंबा देत आहेत, हे दिसून येते. यामुळे कॅनडामधील हिंदूंमध्‍ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

४. कॅनडामधील हिंदूंच्‍या देवतांच्‍या मंदिरांची तोडफोड करणे

अलीकडेच कॅनडामध्‍ये हिंदूंच्‍या देवतांच्‍या मंदिरांवर खलिस्‍तानी आतंकवाद्यांनी आक्रमण करण्‍याची घटना घडली. फेब्रुवारी २०२३ मध्‍ये मिसीसेगा आणि आेंतेरिओ येथील राममंदिरावर आक्रमण करून मंदिराची तोडफोड करण्‍यात आली. मंदिरांच्‍या भिंतींवर हिंदुविरोधी आणि खलिस्‍तानचे समर्थन करणार्‍या घोषणा लिहिण्‍यात आल्‍या. त्‍या आधी सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये टोरंटो येथील ‘बीएपी’च्‍या स्‍वामीनारायण मंदिरावरही अशाच द्वेषपूर्ण घोषणा आणि वाक्‍ये लिहिण्‍यात आली. त्‍याच्‍याही आधी फेब्रुवारी २०२२ मध्‍ये ग्रेटर टोरंटो भागातील ६ हून अधिक मंदिरांची तोडफोड करण्‍यात आली. या मंदिरातील देणगी पेटी, तसेच देवतांच्‍या मूर्तीवरील दागिने चोरून नेण्‍यात आले.

५. हिंदूंच्‍या विरोधातील हिंसाचारात वाढ !

‘स्‍टेटिस्‍टिक कॅनडा’ या वृत्तपत्राने ‘वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत धर्माचा द्वेष करण्‍यावरून झालेल्‍या गुन्‍ह्यांमध्‍ये ७२ टक्‍के वाढ झाली आहे’, असे म्‍हटले आहे. यांपैकी बर्‍याच घटनांमध्‍ये खलिस्‍तानी आतंकवाद्यांच्‍या हिंदुविरोधी कृत्‍यांचा समावेश होता. गेल्‍या सप्‍टेंबर मासात भारताच्‍या परराष्‍ट्र खात्‍याने याविषयी तीव्र चिंता व्‍यक्‍त केली आणि अशांच्‍या विरोधात द्वेषपूर्ण कृत्‍ये करणार्‍यांचा अन् भारतविरोधी कारवायांचा तीव्र निषेध केला.

६. खलिस्‍तानी घटकांना ट्रुडो यांचा पाठिंबा !

ट्रुडो यांच्‍या भारत भेटीच्‍या वेळी जसपाल अटवल (खलिस्‍तानचे समर्थक) यांची भेट घेणे, हे रहस्‍यमय आहे. सध्‍या कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टीन ट्रुडो हे शीख आतंकवाद्यांना प्रोत्‍साहन देत असल्‍याविषयी संताप व्‍यक्‍त केला जात आहे. वर्ष २०१८ मध्‍ये वाढत्‍या शीख मतपेढीचा पाठिंबा मिळवण्‍याच्‍या मोबदल्‍यात ते हे सर्व करत आहेत. भारत भेटीच्‍या वेळी ट्रुडो यांनी अमृतसर (पंजाब) येथील शिखांच्‍या सुवर्णमंदिराला भेट दिली. ट्रुडो हे जसपाल अटवल या ‘इंडो-कॅनेडियन व्‍यापार्‍या’ला प्रोत्‍साहन देत आहेत. या व्‍यापार्‍याने वर्ष १९८६ मध्‍ये एका भारतीय मंत्र्याची हत्‍या केली होती, तसेच खलिस्‍तानी आतंकवादाविषयी त्‍याला सहानुभूती आहे. भारतात ट्रुडो यांच्‍या विरोधात निषेध झाल्‍यावरही ते आपल्‍या मतपेढीच्‍या राजकारणातून माघार घ्‍यायला सिद्ध नाहीत आणि ते कॅनडामधील हिंदूंच्‍या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहेत.

७. जगमित सिंग याचा उदय आणि त्‍याचे खलिस्‍तानवाद्यांशी असलेले संबंध !

कॅनडामधील मुख्‍य राष्‍ट्रीय पक्षाचा पहिला शीख नेता आणि खलिस्‍तानला सहानुभूती देण्‍यास बांधील असलेल्‍या नेत्‍याचा उदय होणे, हे कॅनडामधील मुख्‍य प्रवाहातील राजकारणात आतंकवादाचे आगमन होण्‍याचे संकेत आहेत. जगमित सिंग याने उघडपणे खलिस्‍तानी चळवळीला पाठिंबा दिला असून त्‍याचे प्रमुख खलिस्‍तानी आतंकवाद्यांशी जवळचे संबंध आहेत. कॅनडामधील शीख समाजामध्‍ये असलेली त्‍याची प्रसिद्धी आणि सत्ताधारी ट्रुडो सरकारशी त्‍याची युती यामुळे त्‍याचा राजकारणामध्‍ये प्रचंड प्रभाव आहे. यामुळे कॅनडामधील हिंदूंमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

८. भारताच्‍या प्रत्‍यार्पणाच्‍या विनंतीवर कॅनडाचे मौन !

भारताच्‍या राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून ‘खलिस्‍तानचे समर्थन करणार्‍या आतंकवाद्यांचे प्रत्‍यार्पण करावे किंवा त्‍यांना हद्दपार करावे’, अशी विनंती कॅनडाला अनेक वेळा करण्‍यात आली आहे. या आतंकवाद्यांचा आतंकवाद, हत्‍या आणि इतर गुन्‍ह्यांत सहभाग असल्‍यामुळे ते भारत सरकारला हवे आहेत. भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘कॅनडाचे सरकार आतंकवादी आणि विघटनावादी यांना मोकळीक देत आहे’, अशी टीका केली आहे.

यासंबंधी भारतातील एक ज्‍येष्‍ठ अधिकारी म्‍हणाले, ‘‘अशा घटकांना हद्दपार करावे, याची आम्‍ही वाट पहात आहोत; परंतु कॅनडामधील अधिकार्‍यांनी याविषयी योग्‍य पावले उचलली नाहीत. यासंबंधी पाहिजे असलेला आरोपी पंजाब आणि भारताच्‍या इतर भागांत स्‍थानिक गट यांच्‍याशी संबंध ठेवून आतंकवादी कृत्‍ये करण्‍याविषयी कारवाया करत आहे. कॅनडाकडून याविषयी पाळलेल्‍या मौनावरून उघड होते, ‘आंतरराष्‍ट्रीय आतंकवाद चिरडून टाकण्‍यापेक्षा मतपेढी हे त्‍यांचे प्राधान्‍य आहे.’

(साभार : ‘हिंदुद्वेष डॉट ओआरजी’चे संकेतस्थळ)’