(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड यांची गरळओक !

अन्वर अल हक काकड

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत राहील; कारण हे संयुक्त राष्ट्रांच्या पटलावरील सर्वांत जुने आणि आतापर्यंत न सुटलेले सूत्र आहे, असे विधान पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी ‘व्हाइस ऑफ अमेरिका’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी ते ही मुलाखत देत होते. पंतप्रधान काकड यांनी आरोप केला की, भारताने काश्मीरला जगाचा सर्वांत मोठे कारागृह बनवले आहे. काश्मिरी लोकांचा आवाज दाबला जात आहे. (काश्मीरमध्ये काय स्थिती आहे, हे जगाला ठाऊक आहे. पाकने कितीही खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही ! – संपादक)

तालिबानी आतंकवाद्यांकडून पाक-अफगाणिस्तान सीमेवर आक्रमण केली जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर देशातील निवडणुकांविषयी पंतप्रधान काकड म्हणाले की, अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव असला, तरी सार्वत्रिक निवडणुकीला उशीर होणार नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले त्या त्या ठिकाणी भारताने त्याला फटकारत त्याचे खरे स्वरूप उघड केले आहे. तरी पाकिस्तान निर्लज्जपणे हे सूत्र उपस्थित करून स्वतःची लाज घालवत असतो !
  • काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !