संपादकीय

मणीपूर राज्यात ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’च्या अध्यक्षा सीमा मुस्तफा आणि सदस्या सीमा गुहा, भारत भूषण आणि संजय कपूर या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे चौघे जण मणीपूर राज्यात हिंसाचारामागील ‘सत्य’ शोधण्यासाठी पहाणी दौर्यावर गेले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल सार्वजनिक केला होता. ‘एडिटर्स गिल्ड’चा अहवाल खोटा आणि बनावट असून गिल्डचे सदस्य राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी केला आहे. वरकरणी ही संस्था ‘सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारी’, असे भासवत असली, तरी स्थापनेपासूनच ही संस्था हिंदुद्वेषी आणि हिंदुविरोधी काम करण्यातच आघाडीवर राहिली आहे. हिंदुविरोधकांची तळी उचलणे, देशात झालेल्या विविध दंगलींमध्ये हिंदूंवर अन्याय झाल्यावर गप्प रहाणे, हिंदु साधू-संत, संघटना यांच्यावर अन्याय झाल्यावर कधीच आवाज न उठवणे, हिंदुविरोधी काम करणारे पत्रकार-संपादक यांच्या पाठीशी रहाणे आणि सतत ‘निधर्मी’पणा, धर्मनिरपेक्षता यांचा बुरखा पांघरणे हेच काम आतापर्यंत ‘एडिटर्स गिल्ड’ने केले आहे.
‘एडिटर्स गिल्ड’च्या सदस्यांच्या अहवालात ‘मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात बहुतांश हिंदूंनाच दोषी ठरवण्यात आले होते आणि ‘सरकार कशा प्रकारे या प्रकरणी अयशस्वी ठरले’, हेच त्यात नमूद केले होते. या अहवालात चुराचंदपूर जिल्ह्यातील एक जळत्या घराचे छायाचित्र प्रसारित करून ‘कुकी’ समाजातील व्यक्तीचे घर’, अशी छायाचित्रओळ लिहिली होती. प्रत्यक्षात हे वनाधिकारी कार्यालय होते. यावरून कशा प्रकारे ‘एडिटर्स गिल्ड’ने खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला, तेच पुढे येते. दंगलखोरांना चालना देण्यासाठीच एकप्रकारे हा अहवाल सिद्ध करण्यात आल्याचे म्हणावे लागेल.
उद्देश एक आणि काम भलतेच !
वर्ष १९७८ मध्ये स्थापन झालेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेचा मुख्य उद्देश हा ‘वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचे रक्षण, तसेच वृत्तपत्रे आणि मासिक यांच्या संपादनाचा दर्जा वाढवणे’, असा होता. असे असले, तरी या संघटनेत साम्यवादी आणि निधर्मी संपादकांचा भरणा असल्याने या संघटनेने नेहमीच ‘हिंदुविरोधी भूमिका’ घेण्यात धन्यता मानली. ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ कधीही अन्याय झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संपादकांच्या पाठीशी उभी राहिली नाही. उलट जे पत्रकार आणि संपादक यांनी हिंदुविरोधी वृत्ते दिली, तेव्हा त्यांची तळी उचलण्याचेच काम केले.
दैनिक ‘सनातन प्रभात’चे तत्कालीन संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्यावर पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे नोंदवून त्यांना दोन वेळा अटक केली. तेव्हा कधीही ‘एडिटर्स गिल्ड’ने याचा साधा निषेधही केला नाही कि ‘आम्ही ‘सनातन प्रभात’च्या संपादकांच्या पाठीशी आहोत’, असेही म्हटले नाही. गेल्या २० वर्षांत हिंदुत्वासाठी काम करणारे अनेक पत्रकार, संपादक यांना अटकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांपैकी कुणाच्याही पाठीशी कधी ‘एडिटर्स गिल्ड’ उभी राहिल्याचे ऐकिवात नाही.

याउलट हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी जेव्हा ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबेर याला अटक करण्यात आली, तेव्हा लगेच ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ त्याच्या समर्थनार्थ पुढे आली. वस्तूत: ‘या प्रकरणी ‘एडिटर्स गिल्ड’ने ‘सरकारने जे केले, ते योग्यच केले’, असे सांगून ‘अल्ट न्यूज’च्या महंमद जुबेरला फटकारणे आणि यापुढे कुणीही हिंदूंच्या देवतांचा अवमान करू नये’, असे आवाहन करणे अपेक्षित होते.
एका मागासवर्गीय महिलेने तिच्या संदर्भात खोटा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप केल्यावर उत्तरप्रदेश पोलिसांनी ‘स्क्रोल डॉट इन’च्या संपादिका सुप्रिया शर्मा यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. यावर लगेच टीका करत ‘ही अतीटोकाची प्रतिक्रिया असून माध्यमांचे स्वातंत्र्य अल्प केले जात आहे’, असे घोषित केले होते. पत्रकार तरुण तेजपाल, एम्.जे. अकबर, गौतम अधिकारी या ‘एडिटर्स गिल्ड’च्या सदस्यांवर जेव्हा लैंगिक छळाचे गुन्हे नोंदवले गेले, त्यानंतरही ते सदस्य म्हणून कायम होते. वर्ष २००१ मध्ये तत्कालीन सरकारने आतंकवादविरोधी प्रतिबंधक अध्यादेश आणला होता. यात खोटी माहिती देणार्या पत्रकारांना अटक करण्याचे प्रावधान होते. त्या वेळी लगेच ‘एडिटर्स गिल्ड’मधील साम्यवादी पत्रकारांना ‘हे विधेयक संमत झाल्यास आम्हाला हिंदुविरोधी कारवाया करता येणार नाहीत’, हे लक्षात आल्यावर त्याला लगेच विरोध करत ‘संसदेने अध्यादेश काढतांना पत्रकारांचे स्वातंत्र्य लक्षात ठेवले पाहिजे’, असे म्हटले होते.

अर्णव गोस्वामी यांचे त्यागपत्र !
वर्ष २०२० मध्ये ‘रिपब्लिक टी.व्ही.’चे संपादक अर्णव गोस्वामी त्यांच्या वाहिनीवर ‘पालघर प्रकरणात २ निष्पाप हिंदु साधूंना कशा प्रकारे जमावाने ठार मारले’, याची चर्चा करत होते. त्या वेळी गोस्वामी यांनी ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे अध्यक्ष शेखर गुप्ता यांनी या प्रकरणी मौन बाळगल्यामुळे त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि या संघटनेने विश्वासार्हता गमावल्याचा आरोप करून या संस्थेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. गोस्वामी यांच्याप्रमाणेच ‘एडिटर्स गिल्ड’ची सदस्या पॅट्रिशिया मुखीम यांनी ‘संघटना केवळ ‘स्टार’ संपादकांचा बचाव करते’, असा आरोप करत वर्ष २०२० मध्ये त्यागपत्र दिले होते.

मणीपूरच्या निमित्ताने एकूणच निष्पक्ष पत्रकारितेचा बुरखा पांघरून न्याय मिळवून देण्याचा कथित प्रयत्न करणार्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्याने दुतोंडी भूमिका घेणार्या ‘एडिटर्स गिल्ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्या मागे कोण आहे ?’, ‘त्याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !
| सरकारने हिंदूंना नेहमीच आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्या ‘एडिटर्स गिल्ड’चे सखोल अन्वेषण करावे ! |
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
संपादकीय : शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र, पुढे काय ?
संपादकीय : घटनात्मक सन्मान !
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
संपादकीय – अमेरिकेची कूटनीती !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप